शुक्रवार, ३ जुलै, २००९

प्रिय सखी

प्रिय सखी,

आज आषाढी एकादशी, पाऊस कोसळतोय. जनरली आषाढी एकादशीला पाऊस पडतोच ना ग!
तुला आठवतं आपण तिघी एक वर्ष आषाढी एकादशीलाच पावसात अडकलो होतो? गाड्या ठप्प झालेल्या!
बहुतेक २००० साल असणार.

हो नक्कीच २००० च कारण माझा साखरपुडा नुकताच झालेला. तुम्ही मला हैराण केल होतत आता भेटा आणि म्हणा "बरसात मे हमसे मिले तुम सजन तुमसे मिले हम...."
सगळीच गम्मत नुसती. त्याची नेमकी गाडी चुकली होती. मोबाईल नावाची चीज तेव्हा चैन होती म्हणजे ती आपल्याकडे नसायचीच.

तरी नशीब! आपली ट्रेन भायखळा स्टेशन वर दि एन्ड झाली ते. दि एन्ड तुझा शब्द ना? की मनिषाचा ग?
काही आठवत नाही बघ. गजनी झालाय माझा. त्यात पुन्हा किती वर्षांनी अस पत्र लिहायला बसलेय तुला. ह्या इमेल नी ना हे अस पत्र लिहायची सवयच सुटलेय. आज मुद्दाम लिहीतेय. आठवेल तस नी आठवेल ते सगळं.

तुला आठवतं काय कसरत केली त्या दिवशी आपण. आधी तिथुन बाहेर पडुन गुडघाभर पाण्यातुन टेलीफोन बुथ शोधला. घरी (म्हणजे आपल्या घरांच्या जवळ ज्यांच्याकडे फोन होते त्यांच्याकडे) हालत बयान केली आपली. म्हंटल काळजी करु नका आम्ही इथेच मिनिषाच्या नातेवाईकांकडे राहु पाऊस ओसरेपर्यंत. अर्थात आपल्या तिघींच्या आई बाबांनी विठ्ठलाची आराधना सुरु केलीच असणार तेव्हा. मग नंबर ऑफिसचा, फॉर्मॅलिटी पुर्ण करण्याचा. तिथे काय "नाही येत ठिक आहे. रजा कापु" संपला विषय. पुढे कुठे जाणार, कसे जाल काही नाही. त्यांचही ठिक आहे म्हणा आपण तरी गाड्या बंद एक सुट्टी मिळाली असाच विचार केलेला ना तेव्हा. हे आता सुचतय ह पण, एक दोन रुपेरी छटा चेहरा सजवायला लागल्यावर. तेव्हा जरा रागच आलेला बॉसच्या तुटके पणाचा.

त्यानंतर आपण कुठल्याश्या हॉटेलमधे इडली सांबार खाऊन उपवासाची इतिश्री केली होती ना ग? नी आपल्या दोघिंच्या डब्यातली साबुदाण्याची खिचडी उपवास मोडला तर पुण्य मिळणार नाही अस मानणार्‍या मनिषासाठी ठेवली होती. कसल पाप-पुण्य उपवास मोडण्यात नी न मोडण्यात म्हणा!. भाव महत्वाचा झाल! हे पुन्हा माझी रुपेरी छटा बोलतेय.

तिला तरी ही उपरती झाली असेल का ग आता? की तशीच आहे ती अजुन? भेटते का तुला? तिची आपली दोस्ती(?) जरा गहनच विषय होता तो तेव्हाही आणि आत्ताही. कुठुन तरी कळल तिच लग्न झाल. चला चांगल झाल म्हणायच.

पण त्यादिवशी तरी आधार होता एकमेकिंना एकमेकिंचा. तिच्या आपल्या आचार विचारात तफावत का असेना पण त्या दिवशी तिघी घट्ट मुट्ट मैत्रिणी होतो, हे खरय.

मग थोडावेळ मनिषाच्या जवळच्या (?) नातेवाईकांकडे थांबलो, गरम गरम चहा घेतला होता नाही?. जरी घरी सांगितल असल पाऊस ओसरे पर्यंत तिथेच राहु तरी तिथुन लवकरच निघण भाग होत. आठवत ना एकतर सिंगल रुम, माणस १५ त्यातच एक ओली बाळंतिण म्हणजे आपण थांबतो म्हणण पण संकटच त्यांच्यासाठी. हे आपल्या ब्लॉटिंग पेपर मनाने चटकन टिपलं. मन म्हणजे ब्लॉटींग पेपर हे कुणाच आवडत वाक्य ग? बहुतेक तृप्तीच असेल. नाही. हम्म! मॅथ्सच्या सरांचं. आता आठवलं बघ.

मग तिथुन उगाच कोणी दुखावणार नाही अस काहीतरी कारण पुढे करुन निघालो टॅक्सी शोध मोहीमेवर. जवळ जवळ एक दिड तास शोधत असु नाही आपण टॅक्सी? येव्हढ्या पावसात कोण सुखाचा जीव धोक्यात घालणार?

शेवटी बराच दादापुता करुन आपण एका टॅक्सीवाल्याला कुर्ल्यापर्यंत सोड म्हणुन गळ घातली. तोपर्यंत एक हिरकणी ऑन रिक्वेस्ट अ‍ॅड झाली आपल्यात कुर्ल्याला रहणारी, तिच बाळ पाळणाघरात होत म्हणुन. मग चैघीजणी रडत खडत ३-४ तासानी कुर्ल्याला पोहोचलो (स्टेशन पासुन थोड अलिकडे). आठवत का कुर्ल्याला हे पाणिच पाणि बघुन तू या$$हू करुन ओरडली होतीस. गटार रस्ता हातात हात घालुन होते. समोर अंधार, खाली पाणि आपण तिघी हातात हात धरुन चेंबुरकडे विठ्ठ्लाच्या भरवशावर निघालो होतो. तेव्हढ्यात मनिषाची चप्पल वाहून गेली पाण्यात. कोण हात घालुन काढणार ती? यॅक! मग तसेच चालत राहीलो. चेंबुर च्या पुलापाशी तिच्यासाठी स्लिपर घेतल्या. आणि एकदाचे माझ्या आजीकडे चेंबुरला पोहोचलो. मग मस्त गरम पाण्याने अंघोळ करुन पुन्हा बाहेर जाऊन (हे खरच जिवावर आणि पायावर पण आलेल नाही! कारण पाय नावाच्या अवयवाची पुलंच्या पुस्तकातली गोष्ट सोदाहरण पटली होती) पण घरी विठ्ठलालाच पाण्यात घालुन बसलेल्या आई बाबाना सुखरुप असल्याच कळवण भागच होत. मग बाहेर जाण आलच नेमका आजीचा फोन नुसता लाल डब्बा झालेला तेव्हा. म्हणजे निराळ काही नाही आता जस नेटवर्क नॉट रिचेबल तसच. पण आपल उगाच एम्टीएनएल वर तोंड सुख घेतल तेव्हा.

मग आपण मुगाची खिचडी आणि कढी, पापड लोणच असा मस्त (भुक लागली की सगळच मस्त हे जास्त खरय) बेत करुन जेवलो. आजीकडे माझे ड्रेस ठेवलेले असायचे १-२ म्हणुन बरं, आपल्या दोघींची सोय झाली. मनिषाला मात्र मामीची साडी नी आजीचा ब्लाऊज अस सोंग घ्याव लागलं. (खाते पिते घरके असण अस नडल तिला)

तुला आठवत रात्री माझा मोठा मामा आणि त्याचा मित्र (वारीहुन येत होते ते) बस अडकली म्हणुन आजीकडेच आले? तू म्हणालीस पण ही एक एकादशी उपास मोडुन सुद्धा पावली. खरय ग! एकतर आपण सुखरुप पोहोचलो, आणि दुसर म्हणजे विठोबाची भेट घेऊन आलेला मामा पण भेटला. पहीला प्रसाद आपल्या मुखी गेला.

तुला ठावुक आहे का? ती एकादशी आमची एकत्र अशी शेवटची एकादशी. २००१ माझ्याच लग्न, वर्षसण ह्या नवलाईत फक्त मी आणि माझ्यामधेच गेल आणि २००२ मधे मामा कायमचाच वारीला गेला. आज एकादशी. मी आजही उपवास केलाय. पण हा उपास विठ्ठलासाठी कमी नी त्याच्यासाठी जास्त. दरवर्षी एकादशीला पाऊस पडतो. बाहेर नाही पडला तरी माझ्या मनात मात्र पडतोच पडतो. अगदी २००० साली पडला होता तसा.

तुला पत्र लिहायच कारणही तेच. नेहमी इमेल फॉरवर्ड करतो, कधी फोनाफोनी करतो, क्वचीत वेळ गाठता आली तर गाडीत भेटतोही. बाकी एरव्ही भेट होतेच अस नाही. काही दिवस, आठवणी मात्र कायम बरोबर रहातात. त्यातलीच ही एक जिला तू बरोबर होतीस. म्हणुन हा प्रपंच माझ्या बरोबर तुझी आठवण ताजी करायचा.
बाकी काय आपल्या घोळक्या पैकी बर्‍याच जणींच्या वाटा वेगवेगळ्या झाल्या. आपण तरी अजुन ,अधुन मधुन का होईना छेदतो एकमेकिंची वर्तुळे. नेहमी मी वाढदिवसाच्या तारखा विसरते म्हणुन सगळेच ऐकवतात मला. तुझा वाढदिवस आलाच आहे २ महिन्यानी. ह्या वर्षी नाही विसरणार मी. का माहीत आहे? तुझी आणि मामाची जन्मतारिख एकच आहे. ते जोड्या लावा कस लक्षात ठेवायचो शाळेत तसा लक्षात ठेवलाय मी आता तुझा वाढदिवस.

लिही ग तू पण कधीतरी. फॉरवर्डेड इमेलनी समाधान नाही होत मनाच.

(ता.क. तो कायनॅटीक आठवतो, बघितला परवा. बायको होती बरोबर. कसला सुटलाय. बापरे!बाप म्हणजे बाप झालाच आहे तो मुलगा पण होता बरोबर. बर झाल ह तू त्याला कॉलेजमधे भाव पण दिला नाहीस ते)

तुझी,
कवी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा