शुक्रवार, २२ जून, २०१२

एक उत्तर नसलेला प्रश्न



शेवटचा अध्याय
कधीचाच सुरु झालाय
हे कळलंय केव्हाच,
पचवलय ही हळू हळू
पण नेमकी किती प्रुष्ठसंख्या?
हेच तेव्हढं ज्ञात नाही
अज्ञानातत सुख असतं
असही म्हणता येत नाही
प्रत्येक क्षणीचा हा ताण
टाळताही येत नाही
नी विश्वास टाकून तुझ्या वर
निर्धास्त होणं जमत नाही
काय करु? तुच सांग

मंगळवार, १९ जून, २०१२

उरले केवळ



दु:ख साहणे उरले केवळ
श्वास मोजणे उरले केवळ
लिहून ठेवीले सटवाईने
तेच भोगणे उरले केवळ
हताश झाले जरी कितीही
आस उद्याची सुटली नाही
"उद्या" न येई तरी उद्याची
वाट पाहणे उरले केवळ
पतंग कटता आकाशी मग
दिशाहीन भरकटतो तो ही
वार्‍यावरती भिस्त ठेवूनी
बघत राहणे उरले केवळ