बुधवार, २० जानेवारी, २०१०

अजुन किती काळ?


 

अजुन किती काळ
आम्ही बळी जायचं?
तुमची होते मजा..आणि;
आम्ही मरण कवटाळायच?
दोन अश्रु, नुसती हळहळ
एखादं काव्यं, की संपली कळकळ....
आधी दुर्मिळ करुन;
मग "दुर्मिळ" म्हणुन जगवायच..!
तुमचं असं गणित म्हणा, मला कसं कळायच?
सांगा ना; अजुन किती काळ अस बळी जायचं?
 

(माहीत नाही वरच्या फोटोत नीट समजुन येतय का ते, पण आज पतंगाच्या मांज्यामुळे एक कबुतर समोर तडफडुन गेलेल बघितल आणि पोटात गलबललं )

मन माझे

आठवांच्या सरी मधे
मन माझे चिंब झाले
चिंब मनाच रे सख्या
अलवार गीत झाले
 
असे गीत पापणीच्या
शिंपल्यात लपविले
तरी गूज हे मनाचे
हलकेच ओघळले
 
असे ओघळता मोती
तुझ्या हाताने टिपले
आता कुठे माझे गीत?
तुझे तुझेच रे झाले

प्रार्थना

नको द्वेष हेवा | नको मनी कावा |
अंतरात देवा | क्षमा नांदो ||

दुर्बळांची सेवा | असे जर पुजा |
देवा अशी पुजा | नित्य घडो ||

द्या हो देवा कणा | आणि अनुकंपा |
जगण्यास देवा | दोन्ही लागे ||

सार्थ अभिमान | वृथा अहंकार |
ह्यातला फरक | कळो देवा ||

सन्मार्गाचा मार्ग | जरी खडतर |
चालण्याचे बळ | देई देवा ||

हिच माझी देवा | विनवणी तुला |
सोहळा जन्माचा | सार्थ होवो ||