सोमवार, २१ मे, २०१२

द्वंद्व


"हे आजकाल नेहमीचच झालय तुझं"

"हेऽऽ म्हणजे?"

"हे म्हणजे हेऽच. दरवेळी फिरुन तू स्वत:मधे त्या कॅरेक्टरला कोंबतेस अक्षरश: आणि.."

"आऽऽणि काय? नाही बोलच तू आता. इतके दिवस तुझ्यामुळेच लिहित नव्हते."

"मी कधी म्हणाले तुला लिहू नकोस म्हणून. हे बरय आपलं फाडलं बील माझ्या नावावर.."

"बोलली नव्हतीस गेल्यावेळी? तेच नी तेच विषय बास झाले, काही वेगळा विषय वेगळी अनुभुती असेल तर लिही म्हणून?"

"मग काय चुकीचं बोलले होते का मी?"

"नाही पण बाईसाहेब सांगा की मज पामरास, आणू कुठुन वेगळा विषय?"

"परकाया प्रवेश कराऽ की जरा मॅडम"

"आता केलाच होता ना प्रयत्न गेल्या वेळी एका कथेत. तर काय म्हणालीस?"

"ती त्या वत्सलेचीच ना कथा? आयुष्यावर बोलू काही वाली. मला नको सांगू कौतुक त्या कथेचं. किती वेळा शेवट बदललास?"

"होऽ बदलला, पटतच नव्ह्ता दरवेळी म्हणून बदलला."

"आणि शेवटी काय केलस? कोंबलस त्या वत्सलेला तुझ्यामधे. तुझा पिंड आशावादी आहे म्हणून काय कॅरेक्टरने पण तसच वागायचं? दाखव की तिला वेगळी. मुळात एखादी गोष्ट राहिली अधांतरी तर बिघडलं कुठे? एखाद्या चौकातून चार दिशांना चार रस्ते जातात आणि तुझं कथेतलं पात्र निवडतं तुला त्यातला जो रस्ता आवडतो तोच. का नाही चालुन बघत बाकिच्या रस्त्यांवरुन? सांग ना."

"अगं पण मी लिहितेय म्हणजे मीच निवडणार ना त्यांचा मार्ग?"

"अऽब आऽऽया ऊंऽट पहाड के निचे. मी तेच सांगतेय कधीची तू स्वत:ला त्यांच्यात कोंबतेस नी निर्णय घेतेस. निर्णय तू घेतेस. ते कॅरेक्टर निर्णय घेत नाही. लक्षात येतोय का फरक तुझ्या? तू लिहित्येस म्हणून "अमका" शेवट पण जर तुझ्या ऐवजी "क्ष" व्यक्ती लिहित असती तर..? सांग ना? तर वेगळा पण असता ना शेवट तू केलेल्या शेवटा पेक्षा? तू कॅरेक्टरच्या अंतरंगात शिरुन शेवट केलास हा दावा चूक आहे खरतर. त्या कॅरेक्टरच्या चपलेत तू तुझे पाय नाही घातलेस, त्या कॅरेक्टरचे पायच तुझ्या चपलेच्या मापाने बनवलेस तुझ्याही नकळत."

"मला नाही पटत तुझं म्हणणं"

"पटत नाही की रुचत नाही? का दिलास त्या कथेला आशावादी शेवट? तुला त्या नोटवर संपलेली आवडते कथा म्हणूनच ना? का नाही वेगळा शेवट केलास कथेचा?"

"वेगळा म्हणजे?"

"वेगळा म्हणजे तुझ्या वृत्तीपेक्षा वेगळा. मग भले तो शेवट तुला स्वत:ला पटो न पटो"

"माझ्या पटण्या न पटण्याचा काय संबंध? माझ्या मते ती त्या वत्सलेचीच मत होती. मी तिच्याच जातकुळीत शिरायचा प्रयत्न केला म्हणूनच शेवट बदलला नी आशावादी केला"

"...."

"हसलीस का? काऽऽ हसलीस? टु हेल वीथ यु. तू कोण आहेस शेवटी? काचेच्या तुकड्यात दिसणारी माझी एक प्रतिमा. जाऽऽ मी तुला महत्वच देत नाही. मी आरशा समोर उभं राहून बघते म्हणून तू बोलू शकतेस. मी नाहीच बघितलं तर..."

"........"

"हसू नकोस अशी."

"......."

"तुला सांगितलं ना एकदा हसू नकोस अशी. मीऽऽ मी आरसाच फोडुन टाकेन नाहितर."

-------

खळ्ळ्कन आवाज येतो. आरसा फुटतो. फुटलेल्या तुकड्यांमधे कानावर हात ठेवून उभी असलेली ती एसेमेसच्या रिंग ने दचकून जागी होते नी नेहमीप्रमाणे केरसुणी आणायला पॅसेजमधे जाते.




मंगळवार, १५ मे, २०१२

सांत्वन


जेव्हा जेव्हा कोणाकडे समाचाराला जायचा प्रसंग माझ्यावर येतो तेव्हा अजूनही माझ्या पोटात तितकाच गोळा येतो, घशाला कोरड पडते, नेमके शब्द सापडत नाहीत. मग भले ती व्यक्ती जवळची असो.


येणारा प्रत्येक जण "काय झाल? (असं) कसं झालं? फार वाईट झालं होऽऽ" ही नी अशाच प्रकारची वाक्य फेकत असतो समोरच्याच्या तोंडावर. कॅसेट रिवाईंड प्ले सारखे तेच ते प्रश्न तिच ती उत्तरं .. कंटाळा येत असेल नाही कधीतरी ज्याच्या कडे समाचाराला जातो त्या व्यक्तीलाही ह्या सगळ्या उपचारी गोष्टींचा? नेमका असाच काहीसा विचार मनात येतो नी मग समाचाराला गेल्यावर सगळे "काय झालं... कसं झालं..?" वाले प्रश्न घशातच अडकतात.

पण अशा प्रसंगातही आपलं वेगळं व्यक्तीमत्व, आपली वेगळी ओळख जपणारे काही असतात. नुकतेच माझ्या वाट्याला आलेले हे निवडक अनुभव.

प्रसंग १:- वेळ दुपारची बारा

"येऊ का?" एक लांबच्या नात्यातल्या काकू

"जेवायला बसत होतात का? चुकीच्या वेळी आले वाटतं मी. ह्या बाजूला आलेच होते म्हंटलं जाऊन यावं" पुन्हा एक पुस्ती काकुंची

"नाही नाही या ना, आम्ही सध्या आलटून पालटून जेवतो. सवय झालेय आता" मी

"आजारी होते का?" काकू

हा एकच प्रश्न, माझं १-२ वाक्यात उत्तर आणि मग बाकी सगळं संभाषण निरनिराळ्या ट्रॅक वरुन धावत धावत "अमका पण गेला, तमक्याची मुलगी पळून गेली, अजून कोणा अबक च्या मुलाने काय काय उपद्व्याप केले पासून ते थेट राजकारणाचं काय खरं नाही पर्यंत" सर्व विषयांना सर्व बाजुंनी स्पर्श करत आमचे तीन तास खर्ची घालत चालूच.

त्या "कि करुऽऽ पेट्रोल खतम ही नही होंदा" वाल्या जाहिराती सारखी ह्यांची गाडी चालूच.

"नाही पाणी नको मला. नाही तसं मी काही पाळत वगैरे नाही, की समाचाराला गेल्यावर तिथलं पाणीही पिऊ नये वगैरे.. पण नको" ह्या वाक्याने माझ्या हातातल्या पाण्याच्या ग्लासला बाजुला सारत शेवटी त्यांच्या गाडीचं इंजीन चहा नामक गरम पाणी पिऊन निघालं तेव्हा आम्ही खरतर हुश्श केलं.

अरे तुम्ही समाचाराला आलायत ना? मग चालेल तेच ते का?कधी?केव्हा? कसं वाले प्रश्नसंच विचारलेत तरी. पण कोण कुठच्या लांबच्या नातेवाईकांचा हा खबरनामा नको, असं म्हणायची वेळ येते.

असाच अजून एक वेचक प्रसंग एका नातेवाईक बाईंनी सांत्वन करयला फोन लावलेला तेव्हाचा...

संभाषणाची सुरुवात ठराविक पद्धतीनेच "काऽऽय झालं अचानक? आजारी होते का?" इ.इ.इ. ड्रेस कोड टाईप प्रश्नाने.

माझ्या मनात आतापर्यंतच्या अनुभवाने पुढचा प्रश्न त्यावर माझं छापील उत्तर सगळं तय्यार एकदम.

पण इथे तिनेच "गाईड प्रश्नावली" बाजुला ठेवून गुगली प्रश्न पुढ्यात टाकलेला. "काल तीऽऽ म्हणजे होणारी सुनबाई आलेली असं ऐकलं? खरय का?" ह्या अनपेक्षित हल्ल्याने मी एकदम गार.

प्रसंग काय? तुम्ही विचारताय काय? बरं तेव्हढ्या एका प्रश्नावर समाधान नाही होत. मग अजुन प्रश्न "ती कोण? कुठली?" कोण म्हणजे कोणत्या जातीची पातीची इ. इ. मग हा आंतर जातिय विवाह आहे कळल्यावर सुरु गोसिपंग टाईप प्रश्न एकावर एक.

अरे हे सगळं सविस्तर विचार की पण पुढच्या महिन्यात. आत्ताचे १३ दिवस तर सोडा की त्यातून. ही नक्कीच "खबरे अभी बाकी है, देखते रहिये आजतक" मधे रिपोर्टर म्हणून लागली असती.


असाच अजुन एक प्रसंग, माझी मावशी गेली तेव्हाचा, मला आत्ताही जसाच्या तसा आठवतोय.

झालं असं होतं की तिच्या दोन मुलींपैकी एक जण मोकळेपणाने रडत होती आणि दुसरी जे काही कढ येत होते ते मनात दाबून बाकिच्यांना धीर देत होती. तिचेही डोळे सहाजिकच भरुन येत होते पण तिचा पिंड एकटं असताना/मोजक्या जवळच्या गृप मधे मोकळे पणाने व्यक्त होण्यातला होता. मावशीच्या इमारतीतल्या कोणा एका बाईने तिला आपल्या मिठीत घेत "तू रो ले, तू रो ले एक बार जोरसे आवाज कर" असं म्हणत जे तिला जवळ जवळ धमकावलं ते बघुन मला तिला माझ्या मावज बहिणी विषयी वाटणाऱ्या काळजीपेक्षाही जास्त धास्ती वाटायला लागली. अग बाई, दु:खी ती ही झालेय पण तिची व्यक्त व्हायची पद्धत वेगळी असेल की. आणि त्यातून काही वाटलं तर नंतर सगळे गेल्यावर घे जवळ तिला नी कर मोकळ तिच्या दु:खाला. असं इमारतीच्या खाली सगळी मंडळी असतानाच रडली म्हणजे मोकळी होईल का ती? त्यावेळी त्यांच्या त्या शेजारणीला तरी तसं वाटत होतं हे नक्की.

दरवेळी समोरची सांत्वन करायला आलेली व्यक्तीच पेचात पाडते/ हैराण करते असं नाही हं अजिबात.

कधी कधी सांत्वन करायला आलेली व्यक्तीही "अब मै क्या करु" ह्या संभ्रमात पडते.

आमचे इनामदार सर त्या दिवशी अशाच गोंधळात पडले होते. झालं असं की बाबा गेल्याचं कळलं म्हणुन ते भेटायला आलेले. सुरवातीची चौकशी झाली. नंतरची पाच एक मिनिटं दोन्ही कडून शांततेत गेली. आणि मधेच माझ्या आत्याला आणि चुलत बहिणीला कसलीशी कैक वर्षांपुर्वीच्या कुठल्याश्या प्रसंगाची आठवण झाली. ह्या विषयीच्या आठवणीला सुरुवात कोणत्या शब्दाने झाली ते काहीच आठवत नाही. पण हळू हळू "बाबा, आत्या, ताई आणि त्यांचं गिरिगाव" अशा आठवणीं मधे काही गमतीशीर आठवणी पुढे आल्या आणि आत्ता आत्ता पर्यंतचा "हो ना हो, निदान मुलाचं लग्न तरी बघायला हवं होतं.. पण.." असा दु:खी स्वर बदलत बदलत चक्क हास्यपेरणीला सुरुवात झाली.

इकडे सरांची चुळबुळ सुरु झाली. "आता माझा रोल काय? निघावं का? आणि समोरच्यांना आठवणींमधुन बाहेर काढून येतो आता हे कसं सांगाव?" हे भाव मला सरांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. शेवटी मी आणि भावाने विषय बदलून त्यांची सुटका केली. पण त्यांची त्यावेळी सांगताही येत नाही... टाईप अडचण झालेली खरी.


आता हे सगळे प्रसंग, मला त्यातलं काही तरी खटकल्यामुळे म्हणा किंवा त्या प्रसंगात वेगळे वाटल्यामुळे म्हणा लक्षात राहिलेले. माझी स्वत:ची मात्र अशा प्रसंगी कोणाचं सांत्वन करायला जायची वेळ आली की फारच गाळण उडते. अशा वेळी शब्द पोकळ असतात हे ठावूक असतं त्यामुळे इतरवेळी चटरपटर करणारे ओठ सुईदोऱ्याने शिवल्यासारखे मिटले जातात. मग उरतो फक्त स्पर्श. पण स्वानुभवातून सांगते अशावेळी फक्त एक नजर, हातावर थोपटलेला हलकासा हात देखील पुरतो. शब्दातून सांत्वन करायची गरज इतरांना भासते. जे आपले असतात त्यांच्या देहबोलीतूनच सांत्वन व्यक्त होत असतं, नाही का?