शुक्रवार, ३ जुलै, २००९

मनातला एक कवडसा

सहज मनात जरा डोकावुन बघत होते. स्वतःचेच विचार जरा तपासुन, घासुन पुसुन बघत होते. तेव्हा जाणवल ते हे की -

मला अभंग येत नाहीत पण आवडतात
मला सत्संग, गुरु, सोवळ ओवळ जमत नाही
मला देव देवळात असतो का ते देखील ठावुक नाही
पण समर्पण म्हणजे देव, सत्य म्हणजे शक्ती हे मला पटत
दया क्षमा शांती देवा दे तू माझ्या अंगी हा माझा अभंग
मी माझ्या पुरता गाते. नेहमीच यश येत नाही कारण ..
कारण मी घसरण्याला हरणं मानते
तस नसत, प्रयत्न सोडणं म्हणजे हरणं हे मनाला कळायला हव
मंदिरात माझ मन रमो न रमो, दगडात मला देव दिसो न दिसो
त्याच चैतन्य मला प्रत्येक चराचरात दिसो
माझ मन ही प्रार्थना रोज करत,
कधी यश येत कधी येत नाही
हा माझा दोष, त्याचा नाही.
चुकत माकतच शिकायचं
तसही "श्री" गिरवायला घेतला,
तेव्हा "श्री" म्हणताही येत नव्हतच की
जमेल असच हळु हळू
स्वत:ला तपासत चालत मात्र रहायला हव

हे काव्यही नाही, ललितही नाही. मग प्रश्न पडला हे इथे काय म्हणुन टाकु? मुळात टाकु की नको टाकु? मग विचार केला कोणी ह्याला काहीही म्हणो. चांगले वाईट काहीही किंवा काहिही म्हणण्या इतकेही त्यात काय आहे असा विचार करुन दुर्ल़क्ष करो. जे मनाच्या आरश्यावर उमटले, जे प्रतिबिंब मला स्वच्छ दिसले ते इथे मांडले इतकेच. कॅमेराने काढलेली प्रकाशचित्रे अल्बम करुन बघता येतात. माझ्या मनातल्या कॅमेराने टिपलेल्या ह्या कवडश्यांचे काय? कुठे टाकु ते? म्हणुन टाकले शेवटी इथे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा