बुधवार, ५ ऑगस्ट, २००९

कथा फॉर्म्युल्याची

"वाकडे गावच्या सुजाण नागरिकांनो ऽऽऽऽ... खुषखबर! खुषखबर!! खुषखबर!!! उद्या दिनांक १ एप्रिल रोजी समस्त वाकडेवासीयांसाठी एक आगळी वेगळी भव्य जत्रा शाळेच्या पटांगणात आयोजित करण्यात आली आहे...ऽऽऽ"
‘पीऽऽऽऽ... मा‌ईक टेस्ट टेस्ट’ मधेच असले आवाज काढत ह्या जेमतेम १००० डोकी असलेल्या गावची भव्य(?) जत्रा गावातल्या एकुलत्या एका शाळेच्या पटांगणावर (म्हणजे वर्गांसमोरच्या जागेवर) असल्याचं सांगत एक रिक्षा गावभर म्हणजे ४ गल्ल्यांतुन २० वेळा फिरत होती. मी माझ्या रद्दीच्या दुकानात बसून ही सगळी मिरवणुक म्हणजे ती फिरणारी रिक्षा, त्याच्यामागे पळणारी मुलं बघत होतो. रविवार असला तरी बायको अजुन तिच्या माहेरुन आली नसल्याने मी निवांत होतो. बाहेरगावचे एक पाव्हणे एसटीची वाट बघत माझ्या दुकानात बसलेले तेव्हा.

तेव्हढ्यात समोरुन शिरपा आला नी मला म्हणला "गणप्या, जायचं का मग जत्रेला?"

"जा‌उयात की..." मी म्हटलं त्याला, "नाहीतरी घरी कोण आहे वाट बघायला..."

"पाव्हणं, हा शिरपा बर का. माझा जानी दोस्त. पूर्वी मेंढ्या चारायला जायचा. गावातली हवा बदलली तसा थोडाफार शिकून त्याने स्टेशनरीच्या धंद्यात उडी घेतली. वह्या, पेनं विकता विकता पांढऱ्यावर काळं करायचा नाद लागला त्याला नी आमची दोस्ती आवडीच्या ह्या एकाच रुळावरुन धावू लागली."

"गणप्या, तुला सांगतो ही सगळी वाकडे गुरुजींची पुण्या‌ई बाबा! गेल्या वर्षी कथा स्पर्धा काय, आता ही जत्रा काय, काही वर्षांपूर्वी हेच गाव अंगुठा छाप होतं वाटेल काय कोणा नवख्याला?" शिरप्याचा पॉ‌ईंट बरोबर होता.

"होय रे होय, शिरप्या. माझ्या धंद्याला पण बरकत आलेय त्यामुळे. पाव्हणं, शिरपा म्हणतोय ते अगदी खरं, बरं का. आमच गाव तस छोट असलं तरी १००% साक्षर आहे बर का. त्यातून लिखाणाची सगळ्या गावाला आवड! च्यामारी, बिगरीतला पोर पण लिहीतोय नी ६० वर्षाचा आजा पण लिहीतोय! वाचायलाच कोण नाही अशी परिस्थिती."
"काही वर्षांपूर्वी हे गाव वाकडे नावाच्या गुरुजींनी शाळेच्या प्रेमाखातर जवळ केलं, त्याच्या आधी अंगुठा छाप असलेल्या गावाला मास्तरांनी लिहायला वाचायला (म्हणजे लिहीलेल वाचायला) शिकवल. म्हणुन गावाच नाव बदलुन वाकडे अस झालं. त्यांचा जन्मदिवस १ एप्रिल म्हणुन त्या दिवशी शाळेत असे काही ना काही कार्यक्रम होतात."

"कसली असेल रे ही जत्रा, शिरप्या?" माझ्या मनातली शंका वर आलीच.

"मला तरी काय माहीत मित्रा. कळेलच की गेल्यावर तिथे. शाळेच्या पटांगणावर आहे म्हणे."

"हो रे हो. चल आता भेटू तिथेच संध्याकाळी बरोब्बर पाच वाजता."

"गेल्या वर्षी कथा स्पर्धेत मी आणि शिरपा, आम्ही दोघांनी भाग घेतलेला. तेव्हा एक साचा आणलेला त्याने, म्हणे त्यात फिट बसवायची कथा. स्टेशनरीच सामान घ्यायला घावुक बाजारात जातो, तिथुन काही ना काही अस आणत बसतो. मग पहिला उद्घाटनाचा मान माझाच. पण तो साचा गेला तुटुन नी कथा पडली मोडुन... असो! पुरे झालं माझं गुऱ्हाळ. तुमची पण एसटी आली पाव्हणं समोर. आता मीही झोपतो थोडावेळ की गाठतो शाळा."

-------------------------------------------------

"शिरपा, आत जायला वर्गणी दिसतेय गड्या."

"हे नविन खुळ म्हणायचं!"

"शिरपा, सुट्टे पैसे आहेत का? मग माझ पण तिकिट काढ जरा मी पाकिट घरीच विसरलो."

"गणप्या, ही घे तिकिटं आणि खिशात ठेव सांभाळून. उगाच हातातून गळून पडली आणि इथे एखादा मॉरल पोलिस असेल तर फुकाचा दंड बसेल!"

"हे बाकी खर बोललास, गड्या." त्याने पुढे केलेल्या हातावर मी टाळी देत म्हटलं.

"हि कसली जत्रा म्हणायची, गड्या? आकाश पाळणे नाहीत, नेम धरुन फुगे फोडायचा खेळ नाही, खाजा नाही. काय रे हे गणप्या?"

"हो रे! सगळे नुसते स्टॉल दिसतायत कसले कसले. अबब! इकडे बघ स्वागत फलक काय लिहिलाय तो, शिरपा. साहित्य रसरंजन जत्रा".

"हि कुठली नविन जत्रा?"

"अरे, ते बघ तिकडे, उजव्या हाताला... ओळीत सगळे स्टॉल प्रकाशन मंडळाचे दिसतायत."

"त्याच्या आधी हा कसला स्टॉल आहे? नाव वाचता येतय का रे तुला? काय बरं?"

"अं...अं... हम्म! दिसलं नाव... ‘नवरस स्टॉल’! काय सरबत-बिरबत विकतायत कि काय येव्हढी गर्दी दिसतेय तिथे तर?"

"गणप्या, हे बघ. डावीकडे अजिबात गर्दी नसलेला स्टॉल. तुझ्या दुकानासारखी सगळी रद्दी लावलेली दिसतेय तिथे."

"शिरप्या, येड्या, तो पुस्तकांचा स्टॉल आहे! रद्दीचा नाही..."

"सगळे लिहिणारे वीर असलेल्या गावाच हे अस होत, शिरपा! सगळेच लिहिणारे, वाचणार कोणीच नाही... म्हणुन इथे गर्दी नाही!"

"तहान लागली रे मित्रा. तिथली त्या सरबत वाल्या स्टॉलवरची गर्दी पण कमी झालेय. जा‌उयात का तिथे?"

"चल की मग, शिरप्या... विचारतोस काय असा"

"अहो स्टॉलवाले, दोन लिमका द्या."

"साहेब, इथे लिमका नाही." इति स्टॉलवाला.

"काय म्हणता! लिमका नाही? मग काय आहे दुसरं?"

"साहेब, हि प्यायची सरबतं नाहीत, हि भावनांची सरबतं आहेत! ह्या बाटल्यांमधे साहित्याचे नवरस आहेत." पुन्हा त्या स्टॉलवाल्याने तोंड उघडले.

"म्हणजे कथेत असतात तेच?" मी त्याला टोकत विचारले.

"होय साहेब, तेच आहेत हे." पुन्हा तोच स्टॉलवाला उत्तरला.

"हा!हा!! शिरप्या, ऐकलस का हे काय म्हणतायत ते? हे साहित्याचे नवरस आहेत. तू जागा चुकलास गड्या. हि घशाची तहान भागवायची सरबतं नाहीत, ही तर लिहायची हौस भागवायची सरबतं आहेत!"

"नाही, नाही. स्टॉलवाले, मी तुम्हाला नाही हसत आहे... पण हे काही पटत नाही बॉ मला."

"तस नाही सर, हे आमच्या प्रकाशन कंपनीच नविन प्रॉडक्ट आहे. ह्या ९ रसांच्या ९० च्या वर बाटल्या आहेत. साध्या करुण रसात पण स्वदेशी, विदेशी, घरघरकी कहानी छाप, माहेरची साडी फ़ेम, आ‌ई तुझी आठवण येते टा‌ईप, आर्थिक, सामाजिक असे बऱ्याच प्रकारचे कारुण्य मिळेल तुम्हाला इथे...! इतकच नाही, हास्यरसात पण दादांपासुन आबांपर्यंत सगळ काही आहे. अशा प्रत्येक रसाच्या बाटल्या भरलेल्या आहेत साहेब. प्रेमरस, करुण रस, हास्य रस, गुढ- चमत्कार, वीर रस सगळं सगळं आहे इथे!आता बोला! काय दे‌ऊ?"

"अरे अरे! हो कळलं हे नवरस आहेत ते. पण करु काय मी हे घे‌ऊन? काय रे शिरप्या, तुला तरी माहीत आहे का ह्याच काय करायच ते?"

शिरप्याही अजुबा बघितल्या सारखा त्याच्याकडे बघत होता... मानेने मला ‘नाही नाही’ असं काहीतरी सांगत होता.

"काय विचारता, साहेब तुम्ही, ह्याच करायचं काय म्हणुन! अहो गोष्ट लिहितात हे वापरुन. आजकाल अशीच लिहितात गोष्ट. ह्यातल्या हव्या त्या रसाच्या बाटल्यांमधले चमचा चमचा मिश्रण एकत्र करायच नी कागदावर ओतायच, कि झाली तयार गोष्ट!!"

"स्टॉलवाले, अशी होते गोष्ट तयार? इतकं सोपं असतं होय? गेल्यावर्षीचा शिरप्याने आणलेला नी आता मोडलेला साचा अजुन पडलाय माळ्यावर. त्यात अजुन ह्याने जागा अडवू म्हणतोस? मग बायको मलाच दे‌ईल अडगळीत टाकुन."

"हे!हे! साहेब. विनोद करता काय? अहो ह्या बाटल्यांबरोबर मिश्रण करायचा एक फ़ॉर्म्युला पण देतो की, तो वापरला कि सगळ सोप्प!"

"खोट वाटतय तुम्हाला?" माझ्या चेहर्‍यावरचा अविश्वास बघुन त्याने विचारले. "तुम्हाला प्रात्यक्षिकच करुन दाखवतो. पण आता स्टॉक संपत आलाय, तुफ़ान विक्री झालेय. तरी या इथे. दाखवतो तुम्हाला आहे त्याच्यातच." ...

"हं! तर हे आपल मिश्रण. १ चमचा प्रेम, १ चमचा कारुण्य, १ चमचा गुढ/चमत्कार, १ चमचा विनोद. आता ओतुयात कागदावर. तय्यार?... साहेब, बघा इथे ह्या कागदावर. झाली तयार गोष्ट. वाचा आता."

"इतक्यात झाली तयार? काही विचार नाही, मंथन नाही... हे म्हणजे रेडी टू इट फुडस सारख झालं... झटपट दो मिनिट मे तय्यार!" मी अवाक होत म्हटलं.

"गणप्या, तू वाच रे. माझा चष्मा राहिलाय घरी..." म्हणत शिरप्याने मला पुढे केलं.

"बघु हो स्टॉलवाले. द्या. मी वाचतो मोठ्याने. ऐक रे, शिरपा, तू पण..."

"किर्रऽऽऽर! दिवेलागणीची वेळ, पिंपळाच्या पाराच्या दिशेने कोणीतरी येतय. वाचवा.........! हि कोणाची किंकाळी? थांबा तिच्या मागे जा‌ऊ नका. धोका आहे तिथे. तो पिंपळाचा पार चकवा लावण्यासाठी प्रसिद्ध आहे, ती नक्कीच गंगी आहे...

गेल्यावर्षी इथेच भेटायची दोघं; पिंपळ साक्षी आहे त्यांच्या प्रेमकहाणिला. पिंपळाचा पार भेटायला सर्वात सुरक्षित कारण भुताच्या भितीने गावकरी फिरकत नाहीत तिथे. त्याचाच फायदा घे‌ऊन ‘युद्धात आणि प्रेमात सर्व काही माफ असत’ म्हणत ते इथे भेटत. ह्याच पिंपळाला साक्षी ठेवुन त्यांनी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या नी घरच्यांच्या विरोधाला न जुमानता लग्न केलं. पण फसली बिचारी. वर्षभरातच प्रेम आटल नी गंगीने विहीर जवळ केली...

पळा पळा ती इथेच येतेय. आपल्या दिशेने. तिने गाठलं आपल्याला की संपलो आपण. जिवाच्या आकांताने पळा. रामनाम घेत रहा. वेग वाढवा. तिच्या तावडीत सापडालो तर सुटका नाही आपली. त्या विहीरितुन सुखरुप बाहेर काढल्या पासुन भ्रमिष्ट झालेय ती. एकच नाद उरलाय तिला. ती कथा लिहित फिरते. त्याही भुतांच्या. त्यांचा शोध घेत इथे येते पारावर. भुत भेटतात की नाही माहीत नाही पण भेटणार्‍या प्रत्येकाला भूत समजुन ती तिच्या हातातली प्रश्नपत्रिका वाचायला देते. तिला म्हणे भुतांवर रियालिस्टीक लिहायचय. पुन्हा किंकाळी, वाचवा...! गंगी आलेय"...

"ओ स्टॉलवाले, हि काय गोष्ट झाली?"

"का हो सर, ह्यात सगळं काही आहे की. बघा ना. प्रेम आहे, कारुण्य आहे, विनोद आहे, गुढ आहे. आपलं मिश्रण बरोब्बर आहे की प्रत्येकी एक चमचा. मग दे‌ऊ का बांधुन ५० रुपयाच मिश्रण? गंडलेय म्हणता कथा? अहो हे राहिलेलं मिश्रण होतं म्हणुन असं वाटलं असेल तुम्हाला. ९ रसांच्या फ़ुल्ल भरलेल्या बाटल्या देतो तुम्हाला आणुन गोडा‌ऊन मधुन. मग तर झाल?"

"शिरप्या, चल लेका, हे आपलं काम नाही. आपण आपलं रद्दीच दुकान सांभाळाव हेच खरं. शिरपा, तुला माहितच आहे आपल्या तुटलेल्या साच्याचा नी त्यापायी मोडुन पडलेल्या कथेचा इतिहास. आता विचार करता लक्षात येतय, हातात मिश्रण असलं, फॉर्म्युला लिहिलेला असला तरी शेवटी आत मनाच्या कागदावर उमटत नसेल तर सगळ फुकट आहे बघ वरच्या धुरकट कथेसारख...!"

"काय आहे ना, आपल्या गाववाल्यांची पण काही चुक नाही ह्यात. आत्ता कुठे ह्या नवरसाच्या बाटल्या हाती लागल्यात त्यांच्या. खेळणं म्हणुन वापरत असले ना ते आत्ता, तरी त्यांच तेच शिकत जातील हळु हळु आणि खात्री आहे मला मग ह्या बाटल्या बरोबरच्या फॉर्म्युल्याशिवाय फक्कडशी कथा लिहितील!"

"आणि बर का, स्टॉलवाले, तुमच्या फॉर्म्युलाचा आधार नका दे‌ऊ एकवेळ. पण चुकत माकत लिहिताना पडलोच जर, तर वेळ तेव्हढा द्या सावरायला नी शिकायला. फॉर्म्युल्याशिवाय मनाच्या कागदावर उमटेलच की एकदिवस..."

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा