सोमवार, १३ मे, २०१३

राजगड - बस नाम ही काफी है


राजगड - बस नाम ही काफी है


दिवाळीतल्या सिंहगड पुरंदर कॅम्प दरम्यानच उन्हाळी कॅम्पचं ठिकाण पक्कं झालं "राजगड" बस नाम ही काफी है म्हणायला लावणारा असा हा गडांचा राजा आपल्या राजेंच्या प्रथम राजधानीचा मान पटकवणारा.
ह्याची रचनाही मोठी बघण्यासारखी आहे. मधोमध बालेकिल्ला त्याच्या तीन बाजुला पंख्याची पाती असावीत तशा तीन माच्या पद्मावती, सुवेळा आणि संजीवनी माची. सुवेळाहून सुर्यदेवाच्या आगमनाचा आणि संजीवनी हून त्याच्या परतीच्या प्रवासाचा सोहळा बघावा आणि मधोमध असलेल्या ह्या बालेकिल्ल्याला रेलिंगचा आधार घेत का होईना पण एकदा तरी पाय रोवून नजरेत भरुन घ्यावं. सुवेळाला जाताना लागणार्‍या नेढ्यात मात्र आवाज न करता तिथल्या स्थानिक रहिवाशी असलेल्या मधमाशांना त्रास न देता निसर्गाचा एक घटक होऊन शांतपणे तो थरार अनुभवावा. फ़ेबुवर प्रोफ़ाईल फ़ोटू टाकण्यासाठीच्या पोझचा मोह शक्यतो इथे टाळावा निदान सोबत ४० एक मुलांचा कॅम्प नेला असेल तर नक्कीच टाळावा.
तर असा हा आमचा ट्रेक ज्याची सुरुवात झाली १३ एप्रिल च्या रात्री आणि सांगता झाली १५ एप्रिलच्या रात्री.
१३ ला रात्री निघून पहाटे वाजेघर जवळच्या भोसले वाडीत पोहोचलो. चहा पोहे खाऊन आणि आमच्या एका कार्यकर्त्याचा वाढदिवस केक कापून साजरा करुन आम्ही चढायला सुरुवात केली. सकाळची वेळ असल्याने वातावरण अल्हाददायक होतं, फारशा घामाच्या धारा अजून तरी लागलेल्या नव्हत्या. पाली दरवाजाच्या मार्गे आम्ही पद्मावती मंदिरात पोहोचलो. इथेच आमचा मुक्काम होता. तिथे ठेपले सॉस चा नाष्ता करुन आम्ही रोप घेऊन बालेकिल्ल्याकडे निघालो. घारु मंदीराची देखभाल करायला खालीच रहातो म्हणाला तसही राजे ओळखून आहेतच त्यांच्या ह्या मावळ्याला म्हणून त्याला देखरेख आणि इतर कामं देऊन आम्ही बालेकिल्ल्याकडे कुच केली. भर उन्हाचे गेलो खरे पण आमची दुपार सत्कारणी लागली येव्हढं नक्की. मुलांच्या सुरेक्षीततेच्या दृष्टीने रोप घेऊन गेलो होतो आणि ते एका अर्थी बरच झालं. तसं चढायला कठीण वगैरे नव्हतं विशेष पण रोप मुळे ५० मेंढरांना हाकायची सोय झाली. मनात भिती न बाळगता मुलं पटापट चढून वर गेली आणि नंतर तशीच परतताना न घाबरता खाली आली. खाली आल्यावर भाकरी भाजी भाताचं जेवून बर्‍याच मुलांनी एक छोटीशी डुलकी काढण्याला पसंती दिली. संध्याकाळचा सुर्यास्त संजीवनी वरुन बघीतला. इथे मात्र घारु गेलेला पण मी, सानिका अजून एक मुलगी आणि एक कार्यकर्ती खाली मंदिरातच थांबलो. उन्हाळी पित्ताचा त्रास होत असताना पण ट्रेकला जायची परवानगी नाकारतील बाबा म्हणून ती मुलगी घरी तब्येतीची तक्रार न करता ट्रेकला आली, इथे आल्यावर पित्तामुळे मळमळायला लागल्याने आणि सानुलाही तसाच थोडा त्रास वाटल्याने आम्ही खालीच थांबलो त्या दोघींना सोबत म्हणून.
खाली मंदिरात राहिलोच होतो इतरांना संजीवनीवर जाऊ देऊन तर म्हंटलं वेळ सत्कारणी लावून आमच्या जेवणाची सोय केलेल्या अन्नपुर्णेशी गप्पा माराव्यात. आमच्या अन्नपुर्णा बाई शोभा रसाळ वहिनी आणि त्यांचे कारभारी गुंजवणे गावचे रहिवासी. शिवसेनेच्या झुणका भाकर योजने अंतर्गत त्यांनी पद्मावती मंदिराला लागूनच स्वत:चं झुणका भाकर केंद्र चालू केलं आणि तेव्हापासून दर शनिवार रविवारी ट्रेकर लोकांच्या पोटातल्या कावळ्यांची सोय ते बघतायत. मुलांना शिकण्यासाठी पुण्यात ठेवलय म्हणाल्या. चोर दरवाज्याने सामान सुमान घेऊन दर विकांताला इथे मुक्कामी येतात. आम्ही सोमवारी निघणार होतो म्हणुन आमच्यासाठी सोमवार पर्यंत ते वरच थांबलेले. तिथेच मंदिरात नेहमी येणार्‍या ताकवाल्या आजींना विचारलं तर त्या म्हणे मी "फाटेला निगाले बगा घरनं पार तोरना किल्ला हाय ना तितं हाय माजं गाव" बाऽऽपरे किती ते कष्ट पोटाची खळगी भरण्यासाठी? त्यांना आमच्या शहरातल्या ट्रेन मधून गर्दीत स्वतःला लोटून देत प्रवास करण्याचं कौतुक आणि आम्हाला त्यांच्या पायपिटीचं.
संध्याकाळी नचि आणि पजोने सरप्राईझ देत आम्हाला सुखद धक्का दिला. दुसर्‍या दिवशी सुवेळा दर्शन, निवडक बच्चे कंपनी सकट नेढ्यात बसण्याचा थरार, खाली उतरुन आल्यावर मार्गासनी जवळच्या एका नदीवर मनसोक्त डुंबणं आणि मग जेवून परतीचा प्रवास हाच आमचा ट्रेक.
आता ह्यात वेगळं असं काहीच नाही, तसही बाकी काय लिहीणार मी वेगळं, राजगड तोच त्याच्या माच्या त्यांची वर्णनही तीच आणि तिथला थरारही तसाच बाकीच्या ट्रेकर्सनी लिहून ठेवलाय तसा. फक्त बच्चेकंपनी कॅम्प नेल्याने आलेला अनुभव, मिळालेला आनंद, पुढच्यावेळी प्री कॅम्प ट्रेनिंग म्हणून मुलांना काही सुचना देऊन ठेवायला हव्यात अशा काही गोष्टींची आमच्या अनुभव खात्यात जमा झालेली भर, वारकर्‍याने वारीला जावं त्या नेमाने दरवर्षी वर्षातून दोन वेळा कॅम्पला येणारे आमचे छोटे मावळे, आत्ता आत्तापर्यंत लहान वाटणार्‍या काही मावळ्यांचं तारुण्यातलं पहिलं अडखळतं पाऊल आणि ह्या वयाला जोडून आलेलं हे वयच असं असतं म्हणत जगाला न जुमानता हम करेसो वालं हट्टीपण, वारं पिऊन घेणारं आणि जग कवेत घेऊ शकतो वाटायला लावणारं वयातलं स्थित्यंतर आणि आम्ही फक्त त्याचे साक्षिदार, जणु आम्ही ट्रेक चढून वर आलोय आणि आता ह्या मावळ्यांना चढताना वरुन बघतोय. आमची त्यांची वाट एकच तरी प्रत्येकाचं चढणं, घसरणं सगळं स्वतंत्र वेगळं स्वत:चच असं. ह्या आणि अशा अनेक गोष्टींचं संचित म्हणजे आमचा हा राजगड कॅम्प.
आमचा गृप होता ५६-५७ लोकांचा आणि ह्या ५६-५७ लोकांपैकी मुलं होती ४०-४५, वयोगट होता ९-१९. काही मुलं पहिल्यांदाच ट्रेक हा प्रकार अनुभवणार होती आणि हे सारे पहिलटकर होते ९-१० वर्षाचे मावळे आणि त्यातही विशेष म्हणजे ते आले होते आई वडिलांच बोट सोडून आपापली सॅक आपापल्या पाठीवर घेऊन. चिंटू २ बघताना मला कितीतरी वेळ आमच्या कॅम्पची आठवण येत होती अर्थात तो सिनेमा होता त्यात बर्र्‍याच ट्रेक्सर्सच्या दृष्टीने ७ स्टार्स सोयी दाखवलेल्या प्रत्यक्षात ट्रेक तितकाही आरामदायी नसतो, मजेशीर आणि पुन्हा पुन्हा अनुभवण्यसारखा मात्र नक्कीच असतो.
प्रत्येकाची मानसिक, शारिरीक कुवत सारखी नसते, चालायचीही तितकीशी सवय नसते त्यात आई बाबांपासून दूर आलेली काही पिल्लं लागली की रडायला पद्मावती मंदिरात पोहोचे पर्यंत. आऽऽई पाहिजेऽऽ चा गजर झाल्यावर आणायची कुठून तिथे त्यांची आई. दादापुता करुन गोष्टी गाणी सांगून पाय चेपून दिले, भरवलं तेव्हा कुठे कळी खुलली एकेकाची. इकडे आमचं कन्यारत्न मला बाजुला घेऊन म्हणे, अशी भरवत्येस जसा काही तुझा सख्खा मुलगा आहे आणि मी इथे हाताने जेवतेय स्वत:च्या फिदीफिदी हे राम! तिनेही भरवून घेतलं मगच पळाली बाहेर खेळायला. पण ह्या वयातली मुलं तुम्हाला असं भरवू देतात, तुम्ही गोष्टी गाणी सांगता, प्रेमाने जवळ घेता तेव्हा तेव्हढ्या पुरतं का होईना आई हवीचा हट्ट विसरतात म्हणजे किती निरागसपणे ती तुम्हाला आपलं मानतात हे जाणवून अधिक जबाबदार झाल्या सारखं वाटलं. घरी जाऊन आपापल्या पालकांच्या मिठीत जाईपर्यंत ही छोटी फुलपाखरं मला माझीच बाळं असल्यासारखं वाटलं. हा अनुभव हि आमच्या कॅम्पची देन दुसरं काय?
एकीकडे निरागस पणे आपले बालहट्ट आमच्या कडून पुरवून घेणारी ही मंडळी तर दुसरी कडे टिन एज मधे पहिलं पाऊल टाकलेली तर काही टिन एज मधून बाहेर पडणारी मंडळी होती. त्यामुळेच प्रत्येक वयोगटातले वागण्यातले बदल एका ग्राफ सारखे बघायला मिळाले. अर्थात हे काही शिक्का मोर्तब करण्याइतके निष्कर्ष वगैरे नाहीत तर आलेले काही अनुभव आहेत इतकच.
ह्यातल्या एका मुलाची गोष्ट तर नक्कीच नमुद करण्यासारखी वाटतेय. हा मुलगा आमच्या बरोबर पेठगडच्या ट्रेकला तीन वर्षांपुर्वी आलेला तेव्हा तो ८-९ वीत होता. मस्तीखोर, दिलेली सुचना उडवून लावणे, आई स्पेशली वडील सोबत नाहीत म्हणून एक्स्ट्राचा फ़्रीडम मिळाल्याप्रमाणे वागणे अशा गोष्टींचा त्याने मनसोक्त आनंद लुटला आणि त्यामुळे आम्हाला एकदा अडचणीतही आणले. पण तोच मुलगा ह्यावेळी आला तो पुरेपुर बदलून. आजही तो मस्तीखोर नाही अशातला भाग नाही पण आज तो अडचणीत आणणारा मुलगा न वाटता मदत करायला तत्पर आणि उत्सुक असलेला मॅच्युअर मुलगा जास्त वाटला. अजून एक पिल्लू माझ्या लेकीच्या वयाची म्हणजे ९-१० वर्षाची असल्या पासून येतेय आता टिन एज चालू झालय तिच. पहिल्या ट्रेकच्या वेळी वाट चालताना शाळेतल्या कविता, गोष्टी, मित्र मैत्रिणी, बाई, शाळा असे विषय असायचे सोबतीला आता ह्यावेळी ते विषय थोडे मागे पडून सिनेमा, हिरो हिरॉईन्स, नवीन गाणी हे विषय होते हातात हात घालून. आत्ता आत्ता पर्यंत मैत्री ह्या एकाच नात्याने बांधलेल्या दोन जिवांचे मैत्री ते क्रश ते नवीनच प्रेमात पडलेले युगुल असे बदलते ग्राफ बघायला मिळाले आणि इतकी पटकन मोठी झाली पण ही मुलं ह्या जाणिवेचीच गंमत वाटली.
ट्रेकचा अनुभव लिहायचं ठरलं तेव्हा खरतर ट्रेक म्हणजे राजगड त्याची उंची १३९४ मीटर, त्याचे चढायचे मार्ग तीन, आम्ही निवडलेला मार्ग कोणता? काय बघीतलं हेच लिहायचा विचार होता पण लिहायला घेतलं आणि राजगड नावा बरोबर ह्या बाकीच्याही आठवणी अशा काही जोडून आल्या की प्रयत्न करुनही त्या वेगळ्या करता आल्या नाहीत म्हणून मग जी काही कडू गोड आंबट आठवणींसोबतची भेळ तयार झाली तीच तुमच्या समोर ठेवली झालं.

  (hero & heroin of the day)
 
img src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg-j8LUtEJJU7dAikzQ3NJtcTsDUDQI0BLLhIxKTXgTV58X3MHvTI6pczD-qMbRbZvWJoM6-63frRKTQCYWyjo43AZ3XK_rP2zhWvaFWh8QpILJn-mIZw7nmUBfjKZ4677puQjS8-D2z_g/s800/IMG-20130510-WA0008.jpg" height="601" width="800" />

सोमवार, २२ एप्रिल, २०१३

माझ्या माहेराची वाट


माझ्या माहेराची वाट
वाटेवर हिरवाई
उन्हामधे रापलेल्या
मना सावली ती देई

माहेराच्या वाटेवरी
वाहे खळाळता पाट
शब्द पडती तोकडे
आहे त्याचा असा थाट

उंबर्‍याशी उभी माय
वाट माझी पहातसे
दारातच ओवाळून
दृष्ट माझी काढतसे

मला बघून अंगणी
येई कपीला धावत
हंबरे ती अशी जणू
आले तिचेच पाडस

चार दिसं माहेराचे
होते पुन्हा मी लहान
लहानग्या पोरी परी
घेते घास भरवून

चार दिस उलटता
होते सैरभैर मन
आठवते मनामधे
माझ्या घराचे अंगण

दारापुढची तुळस
गेली असेल सुकून
कोण जाई शिळोप्याच्या
गप्पा तिच्याशी मारुन

अंगणात येता चिऊ
उपाशीच ग जाईल
तिच्यासाठी दाणापाणी
सांग कोण ग ठेवील?

सय तुझी येते माय
परी घर खुणावते
काय करु दोन्ही कडे
मन माझे अडकते

तुझ्या आठवणीं सगे
घर माझे मी गाठते
तुझ्या हातची गोधडी
उब ममतेची देते

बुधवार, ३ एप्रिल, २०१३

बोच


सखी, फार नेटाने चढवला असशील ना
सगळं काही ठीक असल्याचं भासवणारा मुखवटा?
कदाचित आदल्या रात्री येऊन गेलेलं वादळ
पापणी आड परतवून
उसन्या उत्साहाने गेली असशील सामोरी
सकाळच्या पहिल्या किरणाला

वाळूच्या घड्याळातली निसटत जाणारी
वाळू दिसावी,
पण नुसतं बघण्यापलिकडे
काहीही करता येऊ नये
ह्या असहाय्यतेला नुकतीच शिवण घालून
लागली असशील पुन्हा चक्रातलं
आयुष्य जगायला

आणि नेमकं तेव्हाच त्या शिवणीचा दोरा
नकळत अडकून उसवला जावा माझ्याकडून?
तुझ्या जखमेवरची खपली निघायला
मी निमित्त झाले ह्याची बोच राहील
आता बराच काळ मनात

तशी मी ही मुखवट्या आड लपवेन ती बोच
शिवून टाकेन लग्गेच तिला, नकळत झालेली चूक म्हणून
लिहीन त्यावर एक कविता, मिळवेन बरे वाईट प्रतिसाद त्यावरही
कदाचित तू ही वाचशील आणि देशील प्रतिसाद एक तिऱ्हाईत म्हणून
गुरफटून जाऊ आपण दोघीही आपापल्या व्यापात
कायमची एक बोच घेऊन



मंगळवार, १९ फेब्रुवारी, २०१३

नंदनवन फुलले


बोल बोबडे घरी गुंजतील
निर्मळ हसणे मना शांतवील
लोभस रुपडे क्रिष्णाचे हे
तुझ्या घरी अवतरले
पाहुनिया हा सुख सोहळा
मन माझे हर्षिले

कवटाळीशी तू जेव्हा कान्हा
प्रसवेल ममतेचा पान्हा
प्रेमाचे हे रुप अलौकिक
पाहुनी लोचन हे भरले
घराचे गोकुळ की झाले

आई म्हणूनी हाक ऐकता
रोमांचित ग होईल काया
अवीट अशा ह्या आनंदावर
नको कधी दु:खाची छाया

राहो गोकुळ सदा सुखी हे
आशिर्वचन देवा मज द्यावे
हसले बाळ नि बाळा संगे
घर सारे हसले
तुझ्या कृपेने घरामधे
ह्या नंदनवन फुलले

शुक्रवार, ११ जानेवारी, २०१३

इतकच लागतं जगायला

तू म्हणालास,

"जपून ग!
घाटातली वाट, त्यात धुकं दाट"

मी म्हंटलं,
"असुदे रे!
तू सोबत आहेस ना?
मग कसलं धुकं आणि कसला घाट
सोबतीने करु की पार ही वाट"

तू म्हणालास,
"जपून ग!
जगणं म्हणजे नुसती,
अडथळ्यांची शर्यत आहे"

मी म्हंटलं,
"असुदे रे!
सोबत असण्याचं महत्व
म्हणून ना कळत आहे?"

तू म्हणालास,
"आणि मी खचलो तर?"

मी म्हंटलं,
"मी आहे की"

जोड विजोड, रुप अनुरुपता
कळत नाहीत रे मला

अवघड वाटेवर
सोबतीने चालण्याचं वाण
मनापासून निभावतोय
हेच काय ते
ठावूक आहे मला

आणि विश्वास ठेव,
इतकच लागतं जगायला
बाकी काहीच नाही



सोमवार, २२ ऑक्टोबर, २०१२

नसीब का सिक्का


पळणार्‍या घड्याळ्याच्या काट्याशी स्पर्धा करत आवरुन बाहेर पडायचं, ठरलेल्या वर्तमान पत्र वाल्या कडून ठरलेलं वर्तमान पत्र घ्यायचं. १० ची नोट द्यायची नि त्याने ७ रुपये परत केले की ते बसच्या तिकिटासाठीच्या कप्प्यात सरकवून बसच्या सुट्यांची सोयही अशी परस्पर करायची... हे ही नेहमी सारखेच

तो दिवसही त्याला अपवाद नव्हता. वर्तमान पत्र घेतलं, बॅगेत ठेवलं आणि लोकल पकडायला पुन्हा एकदा पायांना घड्याळा बरोबर पळवलं.

प्रचंऽऽड तुडुंब हे शब्द कमी पडतील अशी गर्दी व्हायच्या आधीची आमची वेळ असल्याने त्यामानाने कमी गर्दीच्या गाडीत चढून पेपर अर्धवट का हो‌ईना दुमडून वाचता येण्याचं सुख अनुभवता येतं आम्हाला. तर नेहमीच्याच शिरस्त्याने मोक्याची जागा पकडून उभी राहीले. (मोक्याची जागा म्हणजे ठाणावाल्यांचा धक्का अंगावर येणार नाही + कोणी सतराशे साठ वेळा "जरा प्लीज बॅग ठेवा... ह ह सरळ ठेवा रस भाजी आहे सांडेल.. असं म्हणत आपला हमाल करणार नाही अशी जागा पटकावणे). पेपर हातात घे‌ऊन, मोबा‌ईल गळ्यात अडकवून आणि बॅग वर ठेवून स्थिरस्थावर झाले. पेपर वाचायला घ्यायचा म्हणजे सुरवातीला नुसता चाळायचा आणि सविस्तर वाचण्यासारखं काय काय आहे ह्याची नोंद मेंदू नावाच्या संगणकात करायची, दादर ये‌ई पर्यंत हे सविस्तर वाचन प्रकरण पण संपवायचं हा ही नेहमीचाच शिरस्ता कारण दादरला बसायला मिळालं की तो वेळ शब्दकोड, सुडोकू ह्या करताचा राखून ठेवलेला वेळ.

तर अगदी काहीही बदल न होता तसच कालच्या पानावरुन पुढे नेहमीच्याच ठरलेल्या शिस्तीत ठरलेल्या वेगाने पार पडत होतं. तेव्हढ्यात हातातल्या वर्तमान पत्रातून "ते" जाहीरातीचं पान खाली पडलं. समोर बसलेलीने उचलून दिल्या बद्दल "धन्यवाद" "नो मेन्शनच्या" मॅनरिझमच्या धड्यांची उजळणी झाली आणि बाकी बातम्या बाजूला ठेवून मी तो जाहीरातीचा कागद वाचायला सुरुवात केली.

दिवाळीच्या वेळी मशरुम सारखी प्रदर्शन उगवत असतात त्यातल्याच एका प्रदर्शनाची जाहीरात होती ती.

"जुने द्या नविन घे‌ऊन जा" अशी सुरुवात करुन पुढे "अपने नसीब के सिक्के को पलटो" म्हणत आपल्या खोट्या नशीबाचे पुरावे म्हणून काही किस्से यादी स्वरुपात घे‌ऊन यायला सांगितले होते.

यादी घे‌ऊन येणार्‍याला "नसीब का सिक्का" बदलून मिळणार असल्याचं छापलं होतं.

मनात म्हंटलं हे पण काहीतरी मार्केटिंग गिमिक दिसतय. पण पाच वर्षा मधे एकदाच लागणारं हे प्रदर्शन चुकवू नये म्हणून केलेलं आग्रहाचं निमंत्रण वाचून कधीही लॉटरी न लागणार्‍या माझ्या मनाने हे गॅंबल खेळून तर बघूयात असा निर्णय उभ्या उभ्या (बसायला दादर सीट् आहे ना म्हणून उभ्या उभ्या) घेऊनही टाकला.

आता तिथे जायचा निर्णय घेतला मग यादी करणं आलं. यादी करायची ठरवल्यावर मग काय? ठेवला मनावर दगड आणि दादरला बसायला मिळाल्यावर शब्दकोडं सुडोकू साठी राखीव असलेला वेळ मी केला ह्या यादीकरता खर्च.

नोकरी, छोकरी आणि मोबा‌ईल हे कायम दुसर्‍याचेच चांगले वाटतात असं ऐकून होते म्हणून ते सोडून बाकीच्या छोट्या छोट्या गोष्टींची यादी करायला घेतली.

दिवस मध्य रेल्वेच्या टा‌ईमटेबलने सुरु होतो म्हणून यादीची सुरुवात तिथूनच होणार हे काय वेगळं सांगायला नकोच म्हणा. मुद्देसूद यादी लिहायला सुरुवात झाली. (चवथी सीट असली तरी लिखाणात व्यत्यय येऊ न देण्याचं कसब आता पर्यंत कमावलेलं होतच कोडी सोडवून सोडवून आणि इतर सटर फटर गोष्टी लिहून ते कामी नाही आलं तरच नवल)

तर मुद्दा नंबर १) नशिबवान लोकं जेव्हा फलाटावर लेट येतात तेव्हा लोकल देखील लेट असतात आणि आपण जेव्हा लेट येतो तेव्हा लोकल ऑन टा‌ईम गेलेली असते. मग भलेही ती फलाटापासून फारकत घेतल्यावर चांगली ५ मिनिटं टुक टुक करत तश्शी उभी राहील. आपण दुसर्‍या लोकलची वाट बघत हळहळण्या पलिकडे काहीही करु शकत नाही

२)नशिबवान लोकांना जंप न करता विनासायास बसावयास मिळते. आपण जंप मोड मधे जातो तेव्हा एकतर कोणीतरी पडते, मधे येते, दार लागते किंवा ट्रेन भलतीच फ़ास्ट येते ह्यापैकी काहीही एक होते

३) आपण तिसरी सीट पकडून हुश्श होतो तेव्हा चवथ्या सीटवर आपल्या दुप्पट तिप्पट वजनाची असामी ये‌ऊन टेकते आणि.. पुढे सांगायलाच हवं का?

४) आपण लॉटरी लागल्याच्या आनंदात सटी सहामासी मिळणाऱ्या विंडो सीट वर बसण्याचा आनंद चेहर्‍यावर बाळगत स्वत:वरच खुष होतो तेव्हा नेमकं बाजूचीला झोप अनावर होते आणि कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे? ह्या गाण्याचा वाक्यात उपयोग करत ती आपल्या खुषीला सुरुंग लावते

५) मुंब‌ईच्या ह्या ला‌ईफ ला‌ईन म्हणजे लोकल मधे काय विकायला येत नाही ते विचारा! पण आपल्याला एखादी गोष्ट हवी असते तेव्हा मात्र संपावर गेल्यासारखा एकही फेरीवाला फिरकत नाही.

येव्हढच काय पण आपण भुकेने व्याकूळ हो‌ऊन भेळवालीची वाट बघावी तर तिला नेमकी समोरच्या ट्रेन मधे चढायची बुद्धी होते

लोकल च्या प्रवासात दिवसाचा बराच काळ जात असल्याने लोकलचेच अनुभव पटकन फ्लॅश होतात मेमरी कार्ड मधून.

पण नसीब के सिक्को का ये सिलसिला इथेच थांबत नाही. तुम्ही "दे धक्का" म्हणत जीव, बॅग सांभाळत तुमच्या मुक्कामाच्या ठिकाणी उतरता. ठरलेले भाजी फळ फुलपुडी असे नित्य नेमाचे थांबे घेत घरी येता. चपला काढता काढता तुम्ही पहीले "लेकीच्या/ लेकाच्या दिवसभराच्या कवतिकाचा पाढा ऐकता" अर्थात सवयीचा झाल्याने तो काही फारसा डिस्टर्ब करत नाही तुम्हाला आताशा. पण सगळं आवरुन होतं आणि तुम्ही टेलिव्हिजन बघायला टेकणार तेव्हाच सुपुत्राला/ सुपुत्रीला आठवण होते दुसर्‍या दिवशी न्यायच्या क्राफ्ट ची, संपलेल्या वहीची किंवा अजून कुठल्या अलाणा फलाणा वस्तूची. अशा वेळी "हक्काचा एकमेव" घरात असेल तर बरं पण त्याचं नशीब जोरावर आणि तुमचं नशीब फिरलेलं असेल तर तो ना‌ईट शिफ्टला गेलेला असतो की मग तुम्हालाच पुन्हा बाहेर पडावं लागतं.

आधी नाही का सांगता येत हे वाक्य नेहमी प्रमाणे फुसकं ठरतं. समोरचा बालजीव कसनुसा चेहरा करण्यात पटा‌ईत झालेला असतो तुम्ही त्या निरागस भासणार्‍या चेहर्‍याकडे बघताना ढेपाळता मग तुमचा राग क्षणात हवा गेलेल्या फुग्यासारखा फ़ुस्स हो‌ऊन जातो.

येव्हढ्यावरच हे नशीब प्रकरण थांबत नाही. तर बाकीही बर्‍याच गोष्टीत ते आपापला ठसा उमटवूनच जाते.

आता हेच बघा ना, आमची इन्व्हर्टरची बॅटरी अडीच वर्षातच बदलायची वेळ आली. आता आमचे शेजारी मिस्टर ढगे त्यांनी नेमकं आमचं आणि आमच्या इन्व्हर्टर वाल्याचं बोलणं ऐकलं आणि जाता जाता आम्हाला ऐकवलं "आमची बॅटरी ५ वर्ष चालतेय, काही एक झालं नाही" आता बोला? नेमकी आमचीच बॅटरी अशी निघावी?

बाया आपापल्या मुलांचे हुशारीचे आणिक कसल्या कसल्या परिक्षांमधल्या यशाचे कवतीक करत असताना आम्ही आमची होमवर्क करुन घेतानाची दमछाक आठवतो. इतर बाया "स्वत: नी आणलेल्या गिफ्टा" दाखवताना आम्ही मनात "काय पण फेकते झालं" अशी समजूत घालून उसासतो.

कामवाली बा‌ई हा एक वेगळाच संशोधनाचा विषय आहे. कामवाली म्हंटली की ठरलेल्या वेळेवर न येणं, अचानक दांडी मारणं, आपल्या बाथरुम मधे बसून भांडी घासण्यापूर्वी दहा एक मिनिटं मनसोक्त मशेरी लावणं किंवा किमान पक्षी तोंडात तंबाखुचा बार भरणं, उसने पैसे मागणं हे सगळं कमी अधिक प्रमाणात डिफॉल्ट सेटींग मधेच असतं

नशीब बलवत्तर तर एक गेली की दुसरी कामवाली लिलया मिळवू शकता तुम्ही.

आणि आमच्या नशीबा सारखं नशीब असेल तर दिया लेके ढुंढोगे तो भी को‌ई टिकने वाली कामवाली नही मिलेगी. एक गेली की दुसरी मिळेपर्यंतच्या काळात तुम्हीच काम करता म्हणून जीम लावायची गरज भासत नाही आणि तेव्हढे पैसे वाचतात हाच काय तो फायदा असं आपण मनाला समजावतो पण नसीब के सिक्के वाल्या यादीत ह्या गोष्टींचा देखील समावेश होतो.

नशीबवान लोकं ऑफिसच्या खर्चाने महिन्या दोन महिन्यातून एकदा तरी कुठे ना कुठे ट्रिपा करतात. अरे हो त्याला ट्रिपा नाही म्हणत त्याला सा‌ईट व्हिजिट नाहीतर ऑफिशि‌अल टूर असं म्हणतात. ह्या टूरची टूर टूर ब्लॉग वर, फेसबुकावर पब्लिश करुन वर आणिक फोटो टाकून ते तुमच्या जीवाला उगाचच हुरहुर लावतात.

नशीबवान लोकं डा‌एट की ऐसी की तैसी म्हणत वाट्टेल ते हादडतात तरीही फिगर झिरो मेंटेन करतात आणि आम्ही? हवा खाल्ली तरी तुंदिलतनूच. त्यातल्या त्यात फायदा एकच बि‌इ‌एस्टी च्या बसेस मधे रांग मोडून पुढल्या दरवाजाने आरामात चढता येते.

नशीबवान लोकांनी बो‌अरवेलचं पाणी वापरलं तरी त्यांचे केस ग़ळत नाहीत आणि आमचे गॉन केस कोणत्याही उपायाने परत येत नाहीत. त्यांनी ५०१ बारने जरी अंग घासले तरी त्यांची त्वचा म‌ऊ मुलायमच रहाते आम्ही पि‌अर्स लावा, डोव्ह लावा किंवा दुधाने अंघोळ करा मुलायम त्वचा आमच्याशी फटकूनच रहाते.

तर अशी भली थोरली मारुतीच्या शेपटी सारखी वाढत जाणारी यादी घे‌ऊन मी त्या प्रदर्शनात पोहोचले. "अबबब! येव्हढे कमनशिबी लोकं माझ्याच गावात रहातात?" रांग बघून हे मनात आल्याशिवाय राहिल नाही. तरीही नेटाने माझा नंबर रांगेत कितवा हे मोजायचा एक असफल प्रयत्न करुन पाहीला.

माझा नंबर येईपर्यंत "सिक्के" संपणार तर नाहीत ह्या शंकेची पाल मनात चुकचुकून गेली.

रांगेतल्या पब्लीक ला शिस्त लावता लावता पांडू काकांच्या तोंडाला फेस यायचा बाकी राहीलेला.

बाहेर पार्किंगचा फारच् लोचा झालेला. पार्किंग व्यवस्था बघणार्‍या "मामांना" आधीच् "सिक्का" बदलून् मिळाला असावा असं वाटायला वाव होता.

आम्ही आपले ११ नंबर बसवासी, त्यामुळे मामांच्या दृष्टीने य:किंचीत जीव. मामा आणि पांडू जीगरी दोस्त त्यामुळे पांडूच्याही दृष्टीने आम्ही य:कींचीत जीव. परत त्याचं "नसीब् बदलवणार्‍या सिक्क्या" मधे आमचं स्थान म्हणजे बिलो पॉवर्टी लाईन.

पांडूचं नशीब बदललं की रांगेतलं स्थानही बदलतं हे कळून देखील आम्ही जैसे थेच.

"उम्मीद पे दुनिया कायम है" चा मंत्र जप मनात करत आम्ही डटके तिथेच उभे आमचा नंबर येण्याची वाट पहात

अचानक आमच्या रांगे मधून एक चेहरा रांग सोडून बाजूला होतो. त्याच्या पाठोपाठ त्याचे मित्र् का सगे सोयरे का आणखी कोणी जे असतात ते बाहेर पडतात् आणि आमचा नंबर ध्यानी मनी नसताना एकदम पुढे सरकतो.

मनातल्या मनात त्या निस्वार्थी जीवांना धन्यवाद द्यायला हवेत वाटून् त्यांच्या दिशेने बघते तर् जाणवतं ह्यांना कुठेसं पाहिलय्. नातेवाईक् मंडळींपैकी हे नव्हेत्, मित्रपरिवारा पैकीही हे नाहीत् ह्याची खात्री असते. पण् मग् हे कोण् ते आठवायला खुपच् ताण् द्यावा लागतो डोक्याला. अगदी अस्सं तोंडावर् नाव् आहे पण्.. असं म्हणतो तसं ह्यांच्याबाबतीत् नेहमीचा बघण्यातला चेहरा आहे पण्... असं वाटत् होतं

बराच वेळ ताण दिल्यावर प्रकाश पडला अरे हे तेच्.. प्रसिद्ध व्यक्तीमत्व आमच्या भागातलं. ज्यांचा नुकताच वाढदिवस झाला. आमच्या भागात त्यांच्या "हारदिक अभिनन्दणाचे" फलक लागलेले.

तितक्यात् ते अभिनंदनिय व्यक्तीमत्व आमच्या जवळ येतं. मग नमस्कार चमत्कार होतात. आमची यादी हातात घेऊन् ती वाचून् त्यावर आस्थेने चौकशी होते.

"काळजी करु नका ताई आपलाच स्टॉल आहे हा. पब्लीकला "सिक्का" मिळावा म्हणून आम्ही रांगेतून बाजूला झालो ना" म्हणत गणप्याला आम्हाला सगळ्यांना सिक्के द्यायचं बजावलं जातं.

जन्तेची काळजी बघून आमचं काळीज गलबलतं. "देवा ह्यांना पण् सिक्का दे रे बाबा" असं मागणं सगळ्यात वरच्या आकाशातल्या बापाकडे मागून आम्ही मोकळे होतो.

आमचा नंबर् पुढे सरकत असतानाच माझ्या लक्षात येतं

१)लोडशेडींग मुळे हैराण होणं

२)अपुर्‍या पाणी पुरवठ्यामुळे बाहेरुन स्वखर्चाने मागवावा लागणारा टँकर्

३)वाढती महागाई

४)सगळ्यातली भेसळ

५)जागोजागीचा कचरा, खड्यातले रस्ते

ह्या काही गोष्टी यादीत मी लिहायलाच विसरलेय. तोपर्यंत एकतर माझा नंबर जवळ आलेला असल्याने शिवाय "नको बॉ उगाच अजून किती यादी वाढवत न्यायची" असा मध्यम मार्गी विचार उगाचच् टोकायला लागल्याने मी राहुद्या झालं म्हणत् तशीच् आहे ती यादी घेऊन् उभी राहीले.

जेव्हा खरोखरीच् तो "नसीब् बदलने वाला सिक्का" हाती लागला तेव्हा अगदी "आजमे उपर् आसमा नीचे" म्हणत नाचावसं वाटलं. एकदिवस जरी "सिक्का" खरा निघाला तरी खूप् झालं- नेहमीच्या सावध पवित्रा घेणार्‍या मनाने त्यातही हे मत् नोंदवून् घेतलच्.



दुसर्‍या दिवशी नेहमीच्या शिरस्त्याने वर्तमान पत्र घे‌ऊन फलाटावर आले तर गाडी यायची होती. फलाटावर विशेष गर्दी देखील नव्हती. ठाण्याला उतरणार्‍यांनी दरवाजा अडवून न ठेवल्याने कुठेच नि कोणालाच धक्का बुक्की (शाब्दीक नि शारिरीक दोन्ही) न करता ट्रेनमधे अलगद आत आले. आत घाटकोपर सीट मिळाली (नाही निसीब का सिक्का बिक्का असला तरी डोंबिवलीला चढल्या चढल्या बसायला मिळणे किंवा ठाण्याला बसायला मिळणे इतकीही फ़ॅन्टसी बरी नव्हे)

ट्रेन वेळेवर पोहोचली. संध्याकाळी जंप न करता विनासायास बसायला मिळालं. कुणाच्या खांद्यावर... गाणं आळवावं लागलं नाही आणि आरामात प्रवास झाला. उतरताना "दे धक्का" करावा न लागता सुखरुप उतरले.

घरी आले तर लेकीने अभ्यास संपवून दप्तर भरुन ठेवलेलं, खेळ आवरुन जागेवर गेला होता.

कामवाली न कुरकुरता कामावर आल्याचं समजलं.

नवरोबाने सरप्रा‌ईझ म्हणून मोगर्‍याचा गजरा आणलेला (इथेही मोगर्‍याचा गजरा हिच आमची फ़ॅन्टसीची शिकस्त)

नेहमीचा "कहानी घर घर की" चा एपिसोड न लागता त्याजागी "तुझ्या गळा माझ्या गळा" ची कॅसेट वाजत असलेली बघून मन भरुन आलं.

दिवस संपला तसं लिहायच्या राहून् गेलेल्या "त्या" गोष्टी टाकायला हव्या होत्या असं वाटून् हळहळायला झालं.

"सिक्क्याची एक्पायरी डेट् बघून् घ्या" असा वैधानिक् इशारा छापलेला होता त्या जाहिरातीत, हे लेक मॅग्निफाईंग ग्लासचे उपयोग करत होती म्हणून ध्यानात् आलं. तसही वैधानिक इशारे हे मॅग्निफाईंग ग्लासने बघितले तरच दिसावेत असेच छापावे लागतात. तरच त्यांना वैधानिक इशारा असा दर्जा प्राप्त होतो.

आता परत वाट बघायची प्रदर्शन लागायची म्हणत मी नव्याने लागलेले "अभिनन्दणाचे" फलक वाचत रस्ता क्रॉस केला आणि पळणार्‍या घडाळाच्या काट्यांबरोबर् स्वत्:ला पळवत् लोकल गाठायला फलाटावर् धावले.


बुधवार, २६ सप्टेंबर, २०१२

प्रार्थना


करिते मी धावा । संकट निवारा ।
भयमुक्त करा । गजानना ॥

चिंता क्लेष माझे । जाणसी तू सारे ।
रक्षण करावे । विघ्नहारा ॥

थकले हारले । मोडून पडले ।
शरण मी आले । सावरावे ।

ठरेना वादळ । भरकटे तारु ।
सुखरुप न्यावे । पैलतिरा ॥

तुच माझा राम । तुच माझा शाम ।
सगुण स्वरुप । चैतन्य तू ।

स्विकारुनी सेवा । आशिर्वाद द्यावा
सुखी व्हावे सर्व । आप्तजन ॥