बुधवार, २२ जून, २०११

डोंबिवली स्पेशल : डोंबिवली पुणेरी बाणा



अफव‌ओंपे विश्वास मत रखो! हे मनाला माहीत असतं हो नाही कोण म्हणतय पण बातम्या जेव्हा खासम खाऽस अशा जवळच्या, आतल्या गोटातल्या इसमाकडून येतात तेव्हा विश्वास ठेवावाच लागतो काय करणार.

तर अशीच एक बातमी, मला गेल्याच आठवड्यात समजली. एरव्ही मी तिला "अफवा" असं म्हणून भिरकावून लावली असती. पण ती नेमकी दिली, ती आतल्या गोटातल्या व्यक्तिने. मग काय? मति गहाण ठेवून विश्वास ठेवणं भागच होतं.

खातरजमा करायला ऐकल्याबरोबर तिथे जाणं तर शक्य नव्हतं आमंत्रण मिळालं असतं, अगदी "आगत्याने येणे करावे" टा‌ईपचं आमंत्रण मिळालं असतं तरीही. (आमंत्रण मिळायची शक्यता तशीही कमीच म्हणा. आता हेच बघाना "लेकीला घे‌ऊन जा हो आयुकात" असं नुसतं सांगायचं. पण बा‌ई आयुका लांब पडेल तुला. माझ्याकडे सोय करेन तुझी एखाद दिवस असं कोणी तोंड भरुन म्हणेल तर शप्पथ!)

तर असो मुळ विषय होता ती बातमी... जी आतल्या गोटातून आलेली. बातमी काहीशी अशी होती "पुणं म्हणे बदलतय, पुण्याने म्हणे कात टाकलेय" ह्या टाकलेय शब्दापुढे तिच्या स्वरातून जाणवत होतं आश्चर्य आणि माझ्या मनात ते ऐकताना उमटत होतं प्रश्नचिन्हं.

"म्हणे आजकाल बरीच दुकानं १-४ बंद नसतात." इती माझी बातमीदार.

"नक्की लोंढेकरांची दुकानं असणार ती. जातिवंत पुणेकराची नसणारच." मी बातमीदाराचं म्हणणं एकदम तिच्याच समोर मान्य करायचं नाही म्हणून केवळ हे वाक्य फेकलं.

पण मनातून मी तिच्या बातमीवर कधीचाच विश्वास ठेवलेला कारण पुन्हा तेच ती माझी आतल्या गोटातली खासम खास बातमीदार होती ना. विश्वास न ठेवून सांगते कोणालां. त्यात पुन्हा एका नातेवा‌ईकाचं दुकान त्याचा मुलगा सांभाळायला लागल्यापासून दिवसभर चालु असतं असं एका लग्नाच्या निमित्ताने भेट झाली तेव्हा कळलेलं सत्यवचन होतच जमा, डोकं नावाच्या कपाटात त्यामुळेही ठेवला पटकन विश्वास.

बातमी संपली, बोलणही संपलं, तसा तिने फोनही कट केला. आवांतर बोलून कॉलचं मीटर वाढवायला तो फोन मी थोडीच केलेला!

पुण्याने कात टाकली ठिक आहे. पण मग तिथल्या "पुणेरी बाण्याचं" काय? तो कुणीतरी जपायला नको?

आSहेS आSSहे, हे पुणेपण जपणार ह्या जगात पुण्याबाहेरही कोणी आहे. मी युरेका च्या चालीवर ते आहे आहे म्हणुन गिरकी घेत स्वत:शीच म्हंटलं. त्यांचीच माहिती द्यायला हा लेखप्रपंच आहे ना.

तर लोकहो हे पुणेपण आपल्या परीने जपायचं काम एक मिशन म्हणून गेली बरीच वर्ष काही डोंबिवलीकर्स करत आहेत. पुढे कधीतरी पुणं कात टाकेल ह्याची चाहूल त्या द्रष्ट्या डोंबिवलीकरांना फार पुर्वीच लागली असणार, म्हणून तर ते तो ठेवा पुण्यापासून म्हंटलं तर लांब, म्हंटलं तर ३-४ तासाच्या अंतरावर असलेल्या डोंबिवलीत एक मिशन असल्याप्रमाणे जपत आहेत.

आत्ता त्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्या‌इतपत असेलही कदाचित पण लवकरच ती वाढीला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मला अत्यंत अभिमान वाटतो हे सांगताना की हे "पुणेपण" जपण्याचं काम करणार्‍यांमधे महिलावर्ग आघाडीवर आहे. मी जेव्हा जेव्हा त्यांच्या समोर जाते तेव्हा अगदी दरवेळी त्याच विस्मयचकीत/ भारीत नजरेने त्यांच पुणेपण टिपून घेते.

आज त्यांच्या उदात्त मिशनचा परीचय तुम्हाला व्हावा आणि पुढे मागे डोंबिवलीने पुर्णपणे "पुणेरी बाणा" अंगिकारला तर त्याचं क्रेडीट हे ह्याच दोघींना जावं ह्या निर्मळ उद्देशाने मी हा लेख लिहीत आहे. म्या पामराच्या अल्पमतिने अजून काही जणांची नोंद राहून गेली असेल तर माझा डेटाबेस जरुर अपडेट करावा डोंबिवलीकर्स.

तर ह्या महान कार्यातल्या अग्रणी काकू म्हणजे आमच्या "मुनमुन मिसळ" फेम वाल्या मुनमुन काकू. त्यांच्याच परिचयाने ह्या परिचय कार्याची सुरुवात न झाल्यास त्या स्वत: ये‌ऊन मला खडे बोल लावतील. (सच्च्या डोंबिवलीकराच्या कानात आत्तापर्यंत ते बोल फारसं इमॅजिन न करता देखील त्यातल्या हेल सकट वाजले असतीलच)

"मुनमुनची मिसळ" ह्या अख्यायिके विषयी ऐकतच मी मोठी झालेय. लहानपणापासून मला ह्या नावा विषयी फार कुतुहल होतं आणि हे असं नाव मिसळीच्या दुकानाला देणार्‍या अफलातून व्यक्तीमत्वाला बघायची प्रचंड उत्सुकता होती.

खरतर तेव्हा "मुनमुन" हे नाव "मुनमुन सेन" मुळे डोक्यात फिट्ट होतं आणि "मुनमुन सेन" च्या प्रतिमेमुळेच केवळ मला मिसळवाल्या दुकानाला ते नाव का बॉ दिलय अशी उगाचच उत्सुकता होती.

जेव्हा प्रत्यक्ष तिथे जायची संधी साधली तेव्हा "मुनमुन" हे नाव, ते दुकान चालवणार्‍या काकू आणि तिथे मिळणारी मिसळ ह्या तिन्ही गोष्टींचा मेळ मी काही केल्या घालू शकले नव्हते.

पहिल्यांदा गेले ते मैत्रिणींबरोबर. आम्ही तिघी जणींनी तिथे जायचं ठरवलं. त्याप्रमाणे गेलो देखील तिथे.

गेलो देखील असं लिहायचं कारण, त्यावेळी पॉकेटमनी मिळण्याची चंगळ कॉलेजमधे जायला लागलो तरीही नव्हती. ट्रेनचा पास असायचा, घरुन डबा मिळायचा, रिक्शा वगैरेला लागलेव पैसे तर रोज जाताना मागून घ्यायचे. फारतर दळण आणलं, भाजी आणली तर वरचा एखाद सुट्टा रुपया उदारमनाने आ‌ई ठेवू द्यायची. पार्टी बिर्टी काय ते घरी करायची. हवेच तर मागून घ्यायचे कारण सांगून. अशी पद्धत असताना, नेमके आम्ही "मुनमुनची मिसळ" खायचेय असच सांगून पैसे मागितले. कधी नव्हे ते खरं कारण पटून ते दिले गेले. आणि आम्ही तिघी तिथे जा‌ऊन पोहोचलो.

ह्या तात्काळ परमिशन मिळण्यातच "मुनमुन मिसळ = डोंबिवली चा अभिमान" ह्याची पार्श्वभुमी असण्याची शक्यता नाकारता येत नाही नाहीतर "बाहेरचं खा‌ऊन काय पोटं बिघडवायचेत? की घरातलं अन्न गोड लागेनासं झालय आजकाल?" असं ऐकावं लागायचं इतरवेळी.

तिथे गेलो खर्‍या पण हीऽऽ मोऽठी प्रतिक्षा यादी बघून मागच्या मागे जायची इच्छा झाली. पण समोर का‌उंटर वर बसलेल्या काकुंनी तितक्यात मोठ्या जरब बसवणार्‍या आवाजात विचारलं "किती S? तिघी लेडीज काS?" आणि आम्ही घाबरुन कसबसं, जणू काही तीन लेडीजनी ये‌ऊन काही गुन्हा केलाय ह्या थाटात तोंडातल्या तोंडात पुटपुटत "हो" म्हंटलं.

दुसर्‍या क्षणी त्यांनी एका टेबलावर बसलेल्या जोडप्या पैकी पुरुषाला चक्क ऑर्डर वजा शब्दात सांगितलं "तुम्ही आतल्या बाजूला बसा, मिसेसला बाहेरच्या बाजूला बसुद्या."

गिर्‍हा‌ईकाशी अशा शब्दात कोणी बाहेरच्या हॉटेलमधे बोलतं तर ते गिर्‍हा‌ईक तिथली पायरी पुन्हा कधी न चढतं.

पण काकुंचा शाब्दिक वचक काय सांगावा महाराज. ते जोडपं त्यांनी सांगितल्या प्रमाणेच बसलं. इतकच नव्हे तर नंतर आत जाणार्‍या एका गृहस्थाला काकुंनी चक्क "तुम्ही थांबा, ह्या तिघी आधी आल्यात" असं सांगून चक्क पुन्हा प्रतिक्षा यादीत पाठवलं आणि आमचा नंबर त्या जोडप्याच्या समोरच्या बाकड्यावर लावला.

"एक जण त्या बा‌ईशेजारी बसा, दोघी समोर बसा" अशी सुचना दे‌ऊन जागावाटपाचं काम संपलं.

आम्ही हुश्श हो‌ऊन घाम पुसत ऑर्डर काय द्यायची (म्हणजे तिखट, मिडीयम की साधी मिसळ सांगायची)ह्याचा खल करत होतो. तेव्हढ्यात काकुंचा मुलगा समोर ऑर्डर घ्यायला आला. आमचा नवखेपणा पाहून आणि डिस्कशन ऐकून त्यानेच "मिडीयम घ्या" असा फ़ु.स. (फुकट सल्ला) दिला.

"हा कोण आला टिकोजीराव आम्हाला सांगणारा" असं वाटून माझ्या मैत्रिणिने एक तिखटची ऑर्डर दिली, आम्ही दोघींनी "सेफ प्ले" च्या न्यायाने दोघीमधे एक मिडियम मिसळीची ऑर्डर दिली.

मिसळ आली. येवह्ढही तिखट खायची आमच्या "भाजी आमटीत सुद्धा गुळ" लागणार्‍या पिंडाला सवय नसल्याने, नाक डोळे फुसफुसायला लागले. जा‌ईल तेव्हढ संपवून आम्ही हात धुवायला बाहेर निघतच होतो तेव्हढ्यात काकुंनी आम्हाला ऐकवलच "पुढच्या वेळी साधीच मिसळ घ्या" म्हणून.

काकुंचा मुलगाही सवा‌ई. काकुंच्याच तालमीत तय्यार झालेला.

"मिडियम सांगू की तिखट ए XXXच्या नीट नेता येत नाहीत का प्लेट तुला XXX रस्सा ओत त्या तिखट मधे अजून लक्ष कुठाय XXX" असं एकाच वेळी गिर्‍हा‌ईक, कामाला असणारा पोर्‍या ह्यांच्याशी संवाद साधत बोलतो तेव्हा नवख्या माणसाला थोडं बिचकायला होतच मनातल्या मनात भलतीकडे स्वल्पविराम दिल्याने.

पण तो चेहर्‍यावरची रेषही हलू न देता हे म्हणत असतो. नंतर ऐकून ऐकून आपल्यालाही सवय होते कुठे स्वल्पविराम द्यायचा ह्याची.

(जाणकारांनी फुल्यांमधले संवाद समजून जावेत. अजाण लोकांनी त्यांच्या माहितीतल्या जाणकाराची डिक्शनरी मागवावी, मी जाणून असले तरी ज्या‌अर्थी मी फुल्या वापरल्यात त्या अर्थी मी जाहीर लिहिणार नाही सबब मला विचारु नये ही नम्र विनंती त्या काकु स्टा‌ईल मधे वाचावी. ही विनंती वाचताना जे मला ओळखतात त्यांनी माझा चेहरा डोळ्यासमोर न आणता त्या काकुंचाच चेहरा किंवा तत्वद तुम्हाला जे कोण डॉणीन स्टा‌ईल वाटत असेल तिचा चेहरा डोळ्यासमोर आणावा)

नंतर बर्‍याच वेळा तिथे जायचा योग आला. नंतर कधी तरी तिथे पाटी लागलेली पाहीली "पार्सल मिळणार नाही" अगदी डबा घे‌ऊन गेलात तरी पार्सल मिळणार नाही असं उत्तर मी ऐकलय तिथे.

इतर लोकांन्ना म्हणजे खरतर डोंबिवलीबाहेरच्या लोकांना त्या "मामिच्या मिसळीचे" कोण कौतुक. आता तर म्हणे आमंत्रण मधे स्टा‌ईलीश रित्या ती पेश होते वगैरे वगैरे कोण ते कौतुक. पण आमच्या काकुंच्या प्रेमळ विचारपुशी शिवायची मिसळ म्हणजे बातमे कुछ दम नही लोकहो. खाण्या बरोबर ह्या शाब्दिक फटकेबाजीची जोड हवीच हवी तरच खरी मजा.

अर्थात हे बाहेरच्यांना नाही पटणार म्हणा. त्यांना हा काकंचा मुजोर पणा/उद्धट पणा वाटतो, त्यामुळे केवळ "कोल्ह्याला द्राक्षे आंबट" न्यायाने त्यांना तिथली मिसळदेखील आवडत नाही. पण तरिही सच्चा डोंबिवलीकर अजूनही त्यांच्या फु.स. सकट त्यांच्यावर प्रेम करतो, त्यांच्या दुकाना बाहेरची प्रतिक्षा यादी अजूनही हेच सांगते आमचं "ह्या बाण्यावरही" प्रेम आहे. अस्सल पुणेकर कसा तिथल्या दुकानदारांचे किस्से "कॉय शांगू बा‌ई आमच्या इथली दुकानं ना बंदच असतात १-४" असं लाडीक तक्रार करत सांगतो तसच आम्ही डोंबिवलीकर आमच्या ह्या "मुनमुन मिसळ" वाल्या काकुंबद्दल बोलतो.

मिसळीच्या खालोखाल मराठमोळा पदार्थ म्हणून नंबर लागतो बटाटवड्याचा. तर लोकहो आमच्या इथल्या एक काकू गेली कित्येक वर्ष त्यांचा "पुणेरी बाणा" जपत बटाटेवडे, साबुदाणा वडे विकण्याचा व्यवसाय करतायत. त्यांच्या दुकाना बाहेर "पार्सल मिळणार नाही" अशी पाटी जरी नसली तरी तिथेही एक अनोखी पाटी लक्ष वेधून घेतेच. आणि आपलं लक्ष गेलं नाही चुकुन माकुन तर ते लक्षात आणुन द्यायचं काम त्या काकू अगदी आवडीने करतात.

"नाही नाही नाही, इथे पाव मिळणार नाही"

"पैसे सुट्टे द्यावे"

"आधी पैसे द्या"

अशी वाक्य असलेल्या पाट्या त्यांचा "बाणा" दाखवल्या शिवाय रहातच नाहीत.

प्लीज नोट इथे कृपया, प्लीज अशा शब्दांना जागाच नाहीये कुठेही.

तसही त्या काकुंकडे बघितल्यावर कोणीही त्या सुचनांचं उल्लंघन करण्याच स्वप्नात पण योजणार नाही हा भाग वेगळा.

मला साधं मोठं मं.सु. घालून प्रवास करायची भिती वाटते, इथे ह्या काकू ठसठशीत सोन्याचे दागिने (एखादा दागिना नव्हे, तर शब्दश: दागिने) घालून बटाटे वडे तळत उभ्या असतात. त्यांचेही दुकान संध्याकाळी ६ शिवाय चालूच होत नाही बर्‍याचदा.

आजकालच्या मुलामुलीबद्दल फारच स्वच्छ आणि स्पष्ट मतं त्या त्यांच्याच तोंडावर ऐकवतात. आणि तरिही त्यांच्या दुकानातले बटाटे वडे घेण्यासाठी डोंबिवलीकर प्रेमाने गर्दी करतात.

डोंबिवली करांना देखील डोंबिवलीच्या बर्‍याच अशा गोष्टींचा "जाज्वल्य का कायसासा अभिमान" वाटायला लागलाय. म्हणून तर म्हंटलं पुणं बदलतय, पुणं कात टाकतय असं ऐकलं आणि लक्षात आलं पुणेरी बाणा म्हणून डोक्यात असलेला "जाज्वल्य अभिमान" "गिर्‍हा‌ईक ह्या व्यक्तीला उपर्‍या लोकांनी उगाचच जोडलेली अदब द्यायची पद्धत ह्याविषयी जातिवंत पुणेरी दुकानदारांची असलेली नाराजी" हे सगळे हळू हळू पुण्यातून स्मगल हो‌ऊन डेक्कन क्वीन नाहीतर इंद्रायणी मार्फत डोंबिवलीत ये‌ऊन रुजतय, वाढतय आणि त्याचा आम्हाला चक्क जाज्वल्य का कायसासा अभिमानही वाटतोय.

ती आतल्या गोटातली बातमी अगदीच अफवा नसेल तर पुणेकरंनो सावधान !लवकरच पेटंट घ्या तुमच्या बाण्याचं नाहीतर अजून काही हजारो वर्षांनी "जाज्वल्य अभिमान" "आमच्या वेळी असं नव्हतं" वगैरे कॉपिरा‌ईट टा‌ईपची वाक्य डोंबिवली स्पेशल म्हणून ओळखली जातील ह्यात शंकाच नाही.

जाता जाता: नुकतेच डोंबिवलीच्या भोपर नामक विभागात एका फार जुन्या काळपासून असलेल्या मंदीरात जायचा योग आला. तेव्हा मंदीराच्या बाहेर लावलेल्या फलकाने "हा डोंबिवली बाणा" कुठपर्यंत पोहोचलाय ह्याची झलकच मिळाली. तुम्ही स्वत:च बघा खालच्या प्रचि मधे काय लिहिलय त्या फलकावर ते.