सोमवार, ३० मार्च, २००९

देवाघरची फुलं

रिसेशन, बदलते आर्थिक वारे, अस्थिरता ह्या सगळ्या पार्श्वभुमीवर रविवारची ही "देवाघरच्या फुलांची" भेट खुप काही देऊन गेली.


(ह्या फोटोत पाळण्यात आहेत तिच ती "देवाघरची फुलं". मोठ्या मुलांचे चेहरे ओळखु येतील असे फोटो काढायला कायद्याने बंदी असल्या मुळे त्यांना फक्त माझ्या मनाच्या कॅमेर्‍यात बंद केलय)

अर्थात मी इथेही निमित्त मात्रच होते. माझ्या छोट्या दोस्त कंपुने मलाही सामील करुन घ्यायच ठरवल म्हणुन हे आनंदाचे तुषार मी अनुभवु शकले. त्यांच्या विषयी सांगेनच मी तुम्हाला. आधी थोड ह्या "देवाघरच्या फ़ुलांविषयी" सांगते.

"जननी आशिष" नावाच एक कुटूंब आहे. हो मी कुटूंबच म्हणण पसंत करेन अनाथाश्रम म्हणण्या पेक्षा. तर ह्या कुटूंबा सोबत, त्यातील छोट्या कुटूंबियां सोबत घालवलेले दोन अडीच तास आम्हाला बरेच काही देऊन गेले.

काय केल तिथे जाऊन आम्ही? तर एक छोटासा वाढदिवस सगळ्या मुलांचा. त्यात होता त्यांच्या आवडीचा चॉकलेट केक, फ़ुगे, कागदी टोप्या नी मास्क. पण जाता जाता ह्या मुलांनी माझाच मास्क काढुन टाकला. माझ मन मलाच म्हणाल बाई ग! नीट डोळे उघडे ठेउन बघ. परिस्थीती परिस्थीतीच रडगाण आपण गातो. कधी दैवाला, कधी नशिबाला बोल लाऊन मोकळे होतो. ह्या मुलांनी काय म्हणायच मग? तिथे ह्यातल काहीच नव्हतं. होता फ़क्त निरागस पणा, आणि होत अपार प्रेम. तुम्ही द्याल त्याच्या कितीतरी पटीत तुम्हाला भरभरुन मिळेल इतक, अगदी तुमची दुबळी झोळी भरुन वाहील इतक प्रेम.

त्या मुलांबरोबर अर्थात त्यांच्या आजीही होत्या (ज्यांना आपला बाहेरचा समाज केअर टेकर अस नाव देतो) ते आजी नातवंडांच नात बघताना मनात माझी तुलना होत होती, माझी लेक आणि मी किंवा तिची आजी ह्या नात्याशी. एक उदाहरण देते, मुलांना आम्ही केक दिला होता. चॉकलेट केक, वेफ़र्स, चॉकलेट हे सगळ्या लहान मुलांचे वीक पॉईंट, समोर दिसतोय तो पर्यंत ते त्यावर ताव मारणारच. पहिल्या दोन राऊंड झाल्यावर माझ्यातली आई अस्वस्थ झाली, जेवणाची वेळ जवळ आलेय त्यावेळी असले पदार्थ खाल्ले तर मुलं जेवत नाहीत नीट. मी सानुला म्हणजे माझ्या लेकीला नसत दिलं दोन पिसेसच्या पेक्षा जास्त एकावेळी. आमच्यातल्या एकीला मी तेच सांगत होते तेव्हढ्यात आजी आमच्या कडे आल्या आणि तिच रिक्वेस्ट आम्हाला करुन गेल्या. हेच ते प्रेम आपलेपण, खरी कळकळ, ज्यामुळे मी त्या आश्रमाला एक कुटूंब म्हंटल मघाशी.

मी सानुच्या बबतीत असा विचार करण एक सहज भाव झाला, तिनेच तर मला आई होण म्हणजे काय ते शिकवल ना! पण दुसर्‍यांच्या मुलांना आपल म्हणुन प्रसंगी वाईटपणा घेऊन त्यांना घडवण खुप कठीण काम आहे. अर्थात त्या आजींनाही सलाम कारण ती "दुसर्‍याची मुलं" हे माझ्या मनात आलेल त्यांना वाटलही नसेल तस. मी सानुला दटावाव आणि दुसर्‍या क्षणी तिने माझ्याच पोटाला मिठी मारावी इतक्या सहज होत्या त्या गोष्टी.

ह्या संस्थेशी ह्या पुर्वी गेल्या दिवाळीत माझ्या लेकीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संबंध आला होता. मला खरोखर भावलेली गोष्ट अशी की तेव्हाही त्यांनी कशाचाही आग्रह धरला नव्हता. त्यांना कशाची निकड आहे सध्याच्या घडीला असे विचारले तेव्हा त्यांनी डेटॉल, साबण तत्सम वस्तु सांगितल्या पण पुन्हा हे देखील सांगितलं "तुम्ही अमुक एकाच किंमतीच्या वस्तु द्याव्यात असा आग्रह नाही, अगदी एक छोटी डेटॉलची बाटली द्यावी अस वाटत असेल तरी देखील स्वागत आहे". हे त्यांचा प्रचार करण्यासाठी नव्हे पण एखादा गुण आवडला तर मराठी माणुस त्याच तोंड फ़ाटे पर्यंत जाऊदे पण खाजगीत देखील कौतुक करत नाही अस म्हणतात म्हणुन जे भावल ते प्रामाणिक पणे लिहायचा प्रयत्न केलाय.

अर्थात उडदा माजी काळे गोरे असणारच तत्प्रद सगळ्याच संस्थांचा सगळ्यांना चांगलाच अनुभव आला असेल अस नाही म्हणुनच जे चांगल आहे त्याला त्याच्या चांगुलपणाच माप द्याव म्हणुन हा लेख प्रपंच. तो लिहीत असताना मला माझ्या दोस्त कंपुला विसरुन कस चालेल! मघाशी म्हंटल्या प्रमाणे मी त्यांच्याशी तुमची ओळख करुन देणार आहे.

हा गृप आहे तरुण मंडळींचा. ऑर्कुट वर गप्पा मारता मारता काही समविचारी मुल मुली एकत्र आले आणि एक नेटिझन्स चा खुप छान गृप झाला. ह्या गृप मधे एम.बि.बि.एस होऊन इन्टर्न करणारी राजलक्ष्मी आहे, सिव्हील इंजिनिअर हर्षु आहे, एम.बि.ए. करणारा प्रदीप आहे आणखीही असेच बरेच जण आहेत. गेल्या दिड वर्षा पासुन वेगवेगळ्या अनाथालयांमधे हे "गेट टुगेदर" करतायत. जमेल तशी देणगी किंवा वस्तु देणं, तिथल्या मुलांसाठी चित्रकला, हस्तकला सारख्या विविध स्पर्धा आयोजीत करणं, सगळ्या मुलांचा मिळुन वाढदिवस साजरा करणं, त्या मुलांना बरोबर घेउन नाचणं गाणं थोडक्यात काय आनंद नी प्रेम देणं आणि घेणं. हे आनंदाच लेणं काय असत ह्याचा अनुभव मी ह्या रविवारी पुरेपुर घेतलाय.


(ह्या फोटोत आहेत "जननी आशिष" कुटुंबातील प्रेमळ आज्या आणि ओर्कुट गृप ज्यांच्या मुळे मी हा आनंद सोहळा अनुभवू शकले)

कोणी म्हणेल एक दिवस असा आनंद देऊन निघुन जाल, त्यामुळे मुलांचे बाकीचे ३६४ दिवस का आनंदात जाणारेत? पण ते काही खर नाही, खारीचा वाटा किती मोलाचा असतो हे आपल्याला ठाऊक आहेच. आणि ही सुरुवात आहे. त्यांच पहील पाऊल तर त्यांनी टाकलय पुढे!

तरुण पिढी बहकतेय, चंगळ वादाच्या आहारी जातेय असा घोषा लावणाऱ्यांसाठी (जो पुर्ण पणे चुकीचा नाही पण हे प्रत्येक पिढी म्हणत असते म्हणजे प्रत्येक पिढीत अशी एक फ़ळी असते प्रमाण कमी अधीक असेल) त्यांनी त्यांच्या वागणुकीने उत्तम आदर्श दिलाय. जरी आत्ता त्यांच्यावर ग्रुहस्थाश्रमाच्या जबाबदारींचे ओझे पडलेले नसले तरी पैशाचा अशा प्रकारे विनियोग करावा हे ज्यांच्या मनात येते आणि नुसतेच येत नाही तर त्याला कृतीची जोड मिळते तिथे कौतुक करायलाच हवे.

मी आधी लिहील्या प्रमाणे "देवाघरच्या फ़ुलांची" भेट, त्यातुन मला मिळालेला आनंद हा सर्वस्वी ह्या माझ्या दोस्त कंपु मुळे. हेच जर "बी"घडण असेल मित्रांनो तर "तुम्ही बि-घडाना आणि आम्हाला बी-घडवा"

थोडस ह्या संस्थे विषयी
ही संस्था डोंबिवली च्या एम आय डि सी भागात आहे. ठाणे डोंबिवली करांच्या माहीती साठी सांगते डोंबिवली जिम्खान्याच्या बरोबर समोर त्यांची इमारत आहे. ही संस्था पुर्ण पणे महिलांनी चालवलेली आहे (अर्थात त्यात पुरुष मंडळींची मदत नाही अस नाही मी म्हणणार पण संपुर्ण कमिटी, रोजचे कामकाज बघणारे सगळा महीला वर्ग आहे) ह्या वर्षी गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर त्यांच्या २५० व्या बाळाला आई वडीलांची कुशी आणि पर्यायाने त्या आई वडीलांना निर्मळ आनंदाचा झरा मिळवुन द्यायच काम त्यांनी पुर्ण केलंय.




&

गुरुवार, २६ मार्च, २००९

राग लोभ, अन खेद खंत हे
दिले घेतले इथेच ठेऊ
"तिथे" न लागे ह्यातील काही
आलो तैसे निघुन जाऊ

बुधवार, २५ मार्च, २००९

तेरा चेहरा

हर शक्स मे तेरा
चेहरा नजर आता है
बंद आखो मे तेरा
सपना झलक जाता है

मेघा बरसे तो वो
तेरा पयाम लाता है
पलक से उतरके फिर
दिलमे समा जाता है

हर शक्स मे तेरा
चेहरा नजर आता है

खयाल आता है तो
मन बिखर जाता है
सिमट लू मन को मै
तो वो धोखा दे जाता है

हर शक्स मे तेरा
चेहरा नजर आता है

बावरा मन मेरा जो
बात ये ना समझा है
जख्म ये ना दिखे पर
घाव उसका गहरा है

हर शक्स मे तेरा
चेहरा नजर आता है

जख्म मेरा और भी
गहरा होता जाता है
खयाल तेरा ना उसे
भरने देता है

हर शक्स मे तेरा
चेहरा नजर आता है

न करु याद तुझे तो
बाकी कुछ न रह्ता है
साँस रोकलु तो भी
सारा आलम यु मेहेक जाता है

हर शक्स मे तेरा
चेहरा नजर आता है



(This is my first try in Hindi)

गुरुवार, १२ मार्च, २००९

सल

समीऽर, ऐकतोयस ना, मी दोन तिन हाका मारल्यावर त्याने बघीतल

ह्म्म बोला, नवरा सुखाने पेपर वाचताना बघवत नाही तुम्हा बायकांना.

सोहम,सोहमची मी शब्द जुळवत म्हंटल, सोहमची काळजी वाटते रे. काल पण झोपेत रडत उठला. थोपटुन थोपटुन झोपवला त्याला अगदी लहान मुला सारखा. तू बघितलस ना?

बरं त्याचं काय? इति नवरोबा

त्याच काय काय? नेहमी सारखी मस्ती पण नसते त्याची, सतत काहीतरी विचार करत बसतो. दोन दिवस सांगतोय खाली xxxxजागी दुखतय म्हणुन. दाखवुया का डॉक्टर ना?

झालं तुझ? अग माझे आई किती पाठी लागशील त्याच्या. एकतर शाळांना सुट्टी लागलेय. त्याची दोस्त कंपनी कुठे कुठे गेलेय. त्यात मुंज झाल्यामुळे डोक्याची घेरी बिरी जरा वेगळाच दिसतोय. येणारा जाणारा चिडवतो म्हणुन बसत असेल घरात. मला आठवत माझी मुंज झाली तेव्हा सगळ्य़ांनी मला डोक्यावर वडा वडा म्हणुन टपली मारुन हैराण केल होत. त्याची पण सवय होईल मग येईल पुन्हा मुळ पदावर. नेहमी मस्ती करतो म्हणुन तक्रार करतेस आज नाही करत म्हणून तक्रार. माते धन्य आहेस तू!

आणि उन्हाळी त्रास होत असेल, ते तू आणलयस ना लेमन बार्ली वॉटर ते दे ना त्याला भरपुर. नाही वाटल बर तर जाऊयात डॉक्टर प्रधानांकडे. ठिक आहे? घरगुती उपाय करतेच आहे रे पण ... जाऊदे तू म्हणतोस तसच असेल. मी पण काय वेडी, काही बाही विचार करत बसते. काही दिवस असेच पार पडले आणी एक दिवस चिरंजीव एक प्रश्न घेऊन आले माझ्या कडे

आई, मुंजीत खरा बेडुक भरतात मांडीत?

कुणी सांगितल तुला?

सांग ना पण आई, माझ्या पण भरलाय का?

नाही रे बाळा, कुणी सांगितल तुला? नक्कीच गंमत केली तुझी!

आयुष दादा तर म्हणतो.... नाही खरच त्याने दाखवला पण मला बेडुक.

मग कसा दिसतो तो? मी चेष्टेच्या सुरात विचारलं. बेल वाजली नी विषय तिथेच संपला.

सायले मी सोहमला घेऊन डॉक्टर प्रधानांकडे जाणारे आत्ता तू येणार आहेस का आमच्या बरोबर, ६ ची आहे अपॉईंट्मेंट?

नको आई माझा क्लासच असेल ७.३० पर्यंत तो पर्यंत तुम्ही यालच ना?

बर ठिक आहे पण लवकर घरी आलीस, बाबा आले नसतील तर कुणालाही दार उघडायच नाही शोन्या.

आता पुरे ह आई मी काय सोहम आहे का? चांगली १२ वर्षाची आहे मी. तरी पण ठीक आहे. नाही उघडणार कोणाला दार. कुरियर पण सेफ़्टी डोअर मधुन घेइन. मला पाठ झालय सगळ!

अ‍ॅ$ता पु$ले ह आई मी काय सोहम आहे? माझ का नाव घेतेस ग ताईटले? असा नेहमीचा संवाद होणार म्हणुन मी सोहम कडे बघीतल तर त्याच्या कानावर पण पडल नव्हत जणु तिच वाक्य असा तंद्री लावुन बसला होता कुठेतरी.

काळजात चर्र झाल. मस्तीचा त्रास होतो त्याच्या पण त्याही पेक्षा ह्या वागण्याचा होतोय सध्या. मधेच तंद्री लागते, मधेच दचकतो काय? पोटातच काय दुखत, खाली xxxxच्या जागी तर दुखतच आहे, काल ताप पण होता. माझ्या बाळांची दुखणी तू मला दे रे गणेशा म्हणून हात जोडुन गणेशाला साकड घालुन तिघेही निघालो. सायली क्लासला गेली नी आम्ही डॉक्टरांकडे.

सुदैवाने डॉक्टर वेळेवर आले नी नंबर लगेच लागला.

काय सोहम? कुठे दुखतय बघू? आणि आम्हाला नाही ना बोलावलस मुंजीला? एकीकडे अस म्हणत त्यांच तपासण चालु होतं. थोडा सिरीयस चेहरा झाला त्यांचा, पण एक क्षणच. मग सोहमला बाहेरच्या प्लेरुम मधे खेळायला सांगुन त्यांनी मला समोर बसायला सांगितल.

डॉक्टर काही काळजी करण्यासारख...

माझ वाक्य मधेच तोडत ते म्हणाले, मिसेस जोशी तुम्ही कुठे रहाता? म्हणजे कोण कोण असत घरी?

का हो काय झाल? माझ्या काळजाच पाणि पाणि होत होतं आणि ते थेट न सांगता, घरण्याचा इतिहास विचारत बसलेले.

मी सरला जोशी, समिर म्हणजे सोहमचे बाबा बिइएसटीत क्लेरिकल पोस्ट्वर आहेत. मी घरीच असते. आम्हाला दोन मुलं. मोठी सायली १२ वर्षाची आणि हा सोहम ८ वर्षांचा. आम्ही शास्त्रिनगर भागात रहातो.

बर बर किती दिवसांपासुन तक्रार करतोय सोहम? मला मधेच तोडत त्यांनी विचारलं. झाले असतील ५-६ दिवस आधी वाटल उन्हाळा आहे, पण...

बर ठीक आहे. तुम्हाला माहीत आहे का सोहमची आई त्याला दुखापत झालेय कुणीतरी केल्यासारखी, पडुन लागल्या सारखी नव्हे. येतय का लक्षात?
"It’s a case of sexual abuse. Someone has tried to harm his genitals. that’s why there is swelling and other marks." डॉक्टर प्रोफेशनल भाषेत सांगतात.

भाषा अंगावर येते त्यांची. मी पुतळ्या सारखी निशब्द. अरे कर्मा. काय म्हणायचं हे? इतके दिवस समजत होते सायलीला जपल पाहिजे, मुलगी आहे आता मोठी होत चाललेय. पण हे काय?

माझी अवस्था ओळखुन डॉक्टर बेल वाजवुन पाणि मागवतात. घ्या मिसेस जोशी, शांत व्हा.

शांत व्हा. हा माणुस मला सांगतोय तुमच्या मुलावर काहीतरी शारिरीक अत्याचार झालाय. आणि मी मला शांत व्हायला सांगतोय?

असं होतं कधी कधी मिसेस जोशी. फ़क्त मुलीच नाही मुलगे देखील "sexal abuse" चे बळी ठरतात. सुदैवाने त्याला झालेली शारीरीक दुखापत औषधाने भरुन येण्यासारखी आहे, पण त्याच्या मनाला जी भिती बसलेय, दडपण आहे ते फ़क्त तुम्ही घरचे लोकच प्रेमाने बोलुन, जवळ घेऊन दुर करु शकता.

माझ डोकच सुन्न झाल होत. कस बस रिक्षाने घरी आलो. ७.३० वाजत आले तरी देवापुढे दिवा लावायचं देखील भान राहील नव्हत, की असा छळ मांडल्या बद्दल देवाशीच दावा लावत होते कुणास ठावुक.

समिर साठीही हा मोठा धक्काच होता. पण सोहमला सावरायच तर आम्हाला अजुन विस्कटुन चालणार नव्हत.

हळु हळु रोज थोड थोड गप्पा मारत, त्याच्या मनात शिरलो तेव्हा "बेडुक दाखवतो" प्रकरणा पासुन सगळीच कहाणी बाहेर आली.

अंदाज होताच त्याप्रमाणे आधी आयुषच्या वडीलांनी आम्हाला त्यांचा उत्कर्ष बघवत नाही म्हणुन आम्ही खोट बालंट आणतोय अस म्हंटल. पुढे पोलिस केसची धमकी दिल्यावर तो माणुस घरी येऊन रडला. पोलिसात तक्रार करु नका नाहीतर सोसायटीत तोंड दाखवणं मुश्किल होईल म्हणाले. आमच्या म्हणण्या खातर म्हणा किंवा बदनामीच्या भितीने म्हणा पण ते एकदा डॉक्टर प्रधानांना भेटायला तयार झाले. पुढे प्रधानांच्या सांगण्यावरुन त्यांनी एका मानसोपचार तज्ञांची मदत घ्यायच ठरवल पण ६ महीन्यात ते जागा सोडुन नवीन ठिकाणी रहायला गेले.

आता त्यांच पुढे काय झाल माहीत नाही. पण सोहम मधे औषध, कौन्सिलींग, आणि आमचा संवाद ह्या तिन्ही गोष्टींमुळे खुप चांगला फ़रक पडलाय.

बदललोय ते आम्ही दोघे. कुणावर विश्वास ठेवायचा, कुणावर नाही तेच ठरवू शकत नाही आहोत. माणसं देखील कांगांरुं सारख बाळ सतत जवळ ठेवुन फ़िरु शकली असती तर किती बर अस वाटतय मला.

खर सांगते. इतके दिवस वाटायचं सायली मुलगी आहे, तिला जपल पाहीजे, तिला थोड थोड सांगितल पाहीजे. स्पर्शा स्पर्शातला फ़रक ओळखायला शिकवल पाहीजे. पण सोहम काय मुलगा आहे. तो कुठेही गेला तरी "त्या" बाबतीत सुरक्षीत.

पण तिथेच कमी पडलो आम्ही. आमच्यावर ओढवल तेव्हा कळल, असेही प्रकार होतात. आणि ते देखील आपण सुरक्षीत, सुशिक्षीत म्हणवतो ना त्या समाजात.

कवी, तुला सांगायचा हेतु हाच. मागच्यास ठेच पुढचा शहाणा म्हणतात ना. मी एक ठेच लागुन मग शहाणी झाले. तुझ्या हातात लेखणी आहे. लिहीशील का हे सगळ? जेव्हढे लोक वाचतील तेव्हढे सोहम वाचतील ना ग?

पुढचा एक आठवडा मी नुसती भोवऱ्यात अडकल्या सारखी उलट सुलट फ़िरत होते. नाही उतरल ताकदीने तर? असो नाही पेललं मला तर तो माझ्या लेखणीचा दोष आणि उतरल जर समर्थ पणे तर तिची कळकळ व्यक्त झाली अस मानेन अस ठरवून लिहल आणि तुमच्या पुढे मांडलं.

ह्यात काही दोष असतील तर ते माझ्या लिखाणाचे आहेत. तिचे नाहीत, कारण ती सोळा आणे खरी आहे.

_____________________________

हि एक बातमी म्हणुन वाचली होती. सुन्न झालेले वाचून. मग मनानेच त्या आई जवळ पोहोचायचा प्रयत्न केला आणि झाली "मिसेस जोशींची" गोष्ट. काही शब्द आपण आपल्या पाशी ही उच्चारताना आजुबाजुला बघतो एव्ह्ढा आपल्या वर आपल्या संस्कारांचा पगडा. त्यातून ह्या विषयावर लिहायच ठरवल्यावर सतत भिती वाटत होती, हा विषय नुसताच नाजुक नाही तर अवघड आहे. लिहीताना काही शब्द विषयानुरुप लिहावे लागणार पण कुठे बिभत्स होता कामा नये. हे जमेल का आपल्याला. हेच ते अवघडलेपण. विषयाचा अवाका खुप मोठा आहे. हे अस काही पण होत आणि ते ही आपल्या मध्यमवर्गीय सुरक्षीत चौकटीतही, हे आधी मला पचायला जड गेलेल ते पचवुन तुमच्या पर्यंत मांडण माझ्यासाठी खुप कठीण होतं. खरतर मी पुर्ण exhaust झाले होते लिहिताना.

शुक्रवार, २७ फेब्रुवारी, २००९

सोबत

सात जन्मासाठी सोबत
मला तरी मान्य नाही
आठव्या जन्मी तुझ नसण
मला पटु शकत नाही

जन्मजन्माचे बंध बांध
बांधणारच असशील जर
सोबतीने वाट चाल
चालणारच असशील तर

मधेच हरवून गेले जरी
परत परत फ़िरुन येईन
आठवणींची सावली माझ्या
तुझ्यापाशीच ठेवुन जाईन

घड्याळ

दर सोमवारी मी
हाताला घड्याळ बांधतो
आठवडाभरासाठी मी
त्याच्याशी नाळ बांधतो

एकदा घड्याळ बांधले की
काट्यांचा मी गुलाम होतो
प्रियेशी बोलतानाही
मी काट्यांचे भान राखतो

वर्ष अशीच निघुन जातात
काट्याबरोबर पळत जातात
दिवसेंदिवस घड्याळाशी
नाते गडद करत जातात

एक दिवस अचानक
सेल संपतो घड्याळ थांबत
घड्याळाचा गुलाम मग
धडधडणही विसरुन जातो

हळू हळू सावरतो
काट्यांशिवाय जगु लागतो
घरात छोटा गुलाम मात्र
हाती घड्याळ बांधु लागतो

परत एकदा सोमवार येतो
परत एकदा घड्याळ येत
टिकटिक टिकटिक धडधड धडधड
पिढ्यान पिढ्या चालू रहात

गुरुवार, १९ फेब्रुवारी, २००९

लग्न, सल्ले आणि मी

माझ लग्न ठरल आणि तुम्हाला सांगते एक एक कौन्सलर जाता येता फ़ुकटच कौन्सिलींग करु लागला. तुला सांगते निमे "ह्या पुरुषांना ना पहील्या पासुन असं (इथे माझ्या हतातली रद्दी दोर्‍याने बांधुन दाखवत) मुसक्या बांधुन ठेवल पाहीजे." इथ पासुन ते "संपल ग बाई तुझ स्वातंत्र्य, (एक दोन हुंदके देऊन) अगदी कसाया कडे बांधलेल्या बकरी कडे बघाव तस माझ्या कडे बघत, बाईचा जन्मच बाई असा" पर्यंत सगळ काही व्हायचं.

अहो बाकीचे जाऊदे, आमच्य़ा कामवालीने पण "ताई आत्ताच सांगुन ठेवतो तुमास्नी, बाप्या म्ह्टला की आलच हे!(इथे आचमन आणी नाकाकडे अंगुलीदर्शन करुन) मला घाबरवुन सोडल.

म्हंटल आता होणारच आहे लग्न तर कळेलच हळु हळु कोणता कौन्सलर खरा ते!

लग्ना नंतरची गोष्ट (लगेच असे डोळे मोठे करुन बघु नका माझ्याकडे) ह्याच्या एका मित्राने आम्हाला घरी बोलवून पार्टी दिली, नव्या नवरीला प्रथम घरी आल्यावर काहीतरी भेट देण्याची आपल्याकडे प्रथा आहे. त्याप्रमाणे त्या मित्राच्या आईने मला कुंकु लावुन एक भेट दिली कागदात गुंडाळलेली. म्हंटल असेल एखादा शोपीस किंवा तत्सम गोष्ट, त्याच्या लग्नात डबल आलेली !(नाही आत्ता पर्यंतचा अनुभव असाच होता म्हणुन आपल वाटल).

घरी येऊन बघते तो काय, ते होत एक पुस्तक "मेन आर फ़्रॉम मार्स एन्ड वुमन आर फ़्रॉम व्हिनस" पहील्या पानावर (सु) वाच्य अक्षरात लिहील होत "नव दांपत्यास सहजीवनाची वाटचाल सुरळीत होण्यास"

अरे कर्मा, इथे पण कौन्सलर? काही हरकत नाही, बघु तरी काय म्हंणतय हे पुस्तक म्हणत मी थोड झोपत- वाचत, थोड वाचत-झोपत बघत होते काय काय लिहीलय ते.

पुर्ण कसली वाचतेय. पण मग एक चाळाच लागला, त्यात वाचायच आणि ह्याच्या वागण्याकडे लक्ष द्यायच. तो टिव्ही बघायला लागला उशीरा पर्यंत तर मग म्हनायच "हम्म पुस्तकातल्या प्रमाणे तो त्याच्या कोषात गेला" मग पानं उलटायची "आपाण काय करायच अशावेळी ते बघायला"

वाचून झाल्यावर कळायच कप्पाळ "आज डे नाईट मॅच आहे, कसला कोष अन कसल काय, क्रिकेट म्हंटल्यावर सगळेच जातात क्रिकेट-कोषात" उग्गाच वाचायचा वेळ फ़ुक्कट गेला माझा. तरी पुढ्च्या वेळी तसच व्हायच, मी भिंग घेऊन त्याला पुस्तकाशी पडताळायला जायचे आणि न होणार भांडण व्हायच. अरे म्हंटलं भांडण टाळण्यासाठी हे पुस्तक, आणि त्यावरुनच भांडणं? शेवटी पुस्तक टाकल बांधुन नी ठेवलं माळ्यावर तेव्हा संपली भांडणं. म्हंटल तो "जॉन ग्रे" त्या पुस्तकाचा लेखक हो, तो पडला फ़ॉरेनर, त्याला काय कप्पाळ कळणार ईंडीयन नवरे?

असो तर आता आमचे लग्नाचे ६ महीने निर्धोक म्हणजे सल्ल्यांकडे दुर्लक्ष करुन पार पडले आणि मग काय झालं, सलग ४-५ दिवस आपलं नवरोबांच उशीरा घरी येण सुरु झालं. आधी प्रेमाने विचारुन मग थोड रुसून बघीतल पण छ्या पालथ्या घड्यावर पाणी, पुन्हा आपलं आहेच उशीर आणी उशीर वर मखलाशी काय तर म्हणे डेडलाईन आहे कामाची. असेलही तसच पण तो सल्ल्याचा भूंगा होता ना, तो कानात गुण्गुणायला लागला पहीले कामवालीच वाक्य आठवलं "ताई आत्ताच सांगून ठेवतो तुमास्नी, बाप्या म्हटल की "हे" आलच" .अरे बापरे आता काय करायच?

मी प्रथम वास येतोय का बघीतल तोंडाला. नाही तसा वास तर वाटत नव्हता. चला म्हणजे "हे आलच" मधली पहीली शंका तर फ़िटली म्हणायची. आता त्या "हे" आलच मधल्या दुसर्‍या शंकेच काय? ते कसं कळणार?

मग हळूच त्याचा खिसा, पाकीट तपासून बघीतलं. तर काय? त्यात एक बील होतं! तेही एका साडीचं. साडी? कोणासाठी? मला तर नाही दिली. दोन दिवस वाट बघीतली देईल म्हणून, आडून आडून विचारुन बघीतलं पण छ्या, काही ताकास तूर लागू देत नव्हती स्वारी.

मला तर रडूच आलं. लग्गेच दुसरा भूंगा कानात गुणगुणला "बाईचा जन्मच ग असा, अगदी अगदी कसायाकडच्या बकरी पर्यंत सगळ ऐकू आलं". तो आवाज जातो तोच दुसर्‍या कानात आवाज आला "ह्या पुरुषांना पहील्या पासूनच मुसक्या बांधून ठेवल पाहीजे"

हम्म तिनही कौन्सलर खरेच म्हणायचे!

आज आम्ही एकमेकांना भेटलो तो दिवस, म्हणजे चहा पोह्याचा तो दिवस, पण आजही हा उशीराच येणार होता, लक्षातही नव्हतं त्याला. मी हे आणि अशाच विचारात होते तेव्हढ्यात बेल वाजली. माझी मैत्रिण "सखी" (सखी तिच नाव आहे हो) होती दारात. आल्या आल्याच तिने जाहीर करुन टाकलं "आज मी तुला घेऊन जायला आले आहे, मस्त व्याख्यान आहे रिलेशनशिप वर आणि मुख्य म्हणजे फ़्रि पासेस आहेत नी आमचे हे बाहेरगावी गेलेत" अच्छा म्हणजे तिच्या ह्यांच्या रिक्त जागी सध्या माझी वर्णी आहे तर. काही हरकत नाही, नाहीतरी आमचेही नवरोबा आज लेटच येणार आहेत तर जाव म्हणते पैसे थोडीच पडणारेत मला असा विचार करुन आवरुन निघाले तिच्या बरोबर.

जाताना तिच्या हातातल्या त्या कार्यक्रमाच्या जाहीरातितलाच वरचा भाग कापून मागच्या कोर्‍या भागात निरोप लिहून ठेवला "मी बाहेर जातेय, यायला उशीर होईल, काळजी नसावी. तुझी निमा"

त्यातल्या तुझी वर सखीने टवाळकी केल्यावर ते खोडून टाकलं आणी कुलूप लाऊन आम्ही व्याख्यानाला पोहोचलो.

तिथे पोहोचलो तर सगळी कडे "सुखी संसाराचे सार" "दांपत्य जीवन" वगैरे जड जड शब्दातले सुविचार, तक्ते टांगलेले. मी म्हणाले पण सखीला, सखे सार वरुन आठवल आज ह्याच्यावर चिडून मी टोमॅटो सार चा बेत कॅन्सल केला बघ" तिने हातानेच दाबत कुठेपण काहीपण आठवत तुला अस म्हणत मला एका कौन्टरवर नेलं. तिथे पाहीलं तर काय जागात असतील नसतील तेव्हढी पुस्तक अगदी अगदी त्या तक्त्यांना शोभतील अशी विकण्यास उपलब्ध होती. मला मात्र आठवलं "मेन आर फ़्रॉम..., कोष.., भिंग आणि माळा".

तितक्यात भाषणाला सुरुवात झाली आणि मी आवरुन (म्हणजे माझे विचार आवरून) सावरून बसले ऐकायला.

पहीलच वाक्य "तुम्हाला असं वाटतं का, की तुमची जोडीदाराची निवड चुकली म्हणून?" आयला! सटकन तोंडातून शिवी सटकली, कॉलेजची खोड काय करणार. म्हंटलं खल्लास विकेट एकेदम! माझी नव्हे मला अजून अस वाटतय का हे समजायला पण वेळ नाही! तर बाकीच्यांची म्हंटल मी, सगळे माना डोलवत होते.

मग तो पुढे बरच काही सांगत होता, प्रेमाच्य़ा वेगवेगळ्या स्टेजेस का काहीस अबोध वगैरे. प्रथम काय तर म्हणे आपण प्रेमात पडतो "धप्प" म्हणजे "वुई लिटरली स्वेप्ट ऑफ़ .. वगैरे वगैरे"

अरे बापरे! एकदा ह्याच्याच बायकोला भेटून विचारल पाहीजे आत्ता ह्यांच प्रेम कोणत्या स्टेजला आहे ते! श्शी काय बोअर होतय सखे, चल सटकूया इथून ब्रेक संपायच्या आत. नाहीतरी हे सगळ इथुन तिथुन येतच असतं ग अंगावर कधी नेट मधून, कधी इमेल मधून. मी गळ घालताच दोघी निघालो बाहेर. बाहेर मस्त भेळ आणि मस्तानी आयस्क्रीमवर ताव मारुन व्याख्यानाचा "दि एन्ड" करुन घरी परतले सखीला कटवून. हो तिचा नवरा आहे सध्या बाहेरगावी, ये म्हणता येऊन ठोकेल मुक्काम माझ्याच घरी!

घरी येऊन बघते तो काय? माझ नवरा एव्हढासा चेहरा करून माझ्या निरोपाचा कागद उलट सुलट करुन बघत होता. मी गेल्या गेल्या माझा हात हातात घेऊन मला विचारतो "निमु खरच तुला अस वाटतं का ग?"

मला तर आधी काहीच कळेना, मग त्याच्या हातातला तो निरोपाचा कागद घेतला तेव्हा कळलं त्यावर व्याख्यानाच्या जाहीरातीच फ़क्त एकच वाक्य होत "तुमची निवड चुकली तर नाही ना? येऊन भेटा!"

अछ्छा! तर हे कारण आहे होय गोगलगाय होण्याच! बिच्चारा, सगळे कौन्सलर दाराच्या बाहेर घालवुन दिले अगदी त्या जाहीरातीलाही टोपली दाखवली, आणी हो त्याने नुकतीच सरप्राईज़ गिफ़्ट दिलेली "ती" साडी नेसुन बाहेर पडले त्याच्याबरोबर पुर्ण चंद्र बघायला.

खरतर माझी गोष्ट इथेच संपली पण म्हणतात ना, सल्ले घ्यायचे थांबवले तरी द्यायची खोड काही जात नाही. त्यातलाच प्रकार. आहो आता मी सुद्धा तेच करायला लागले. स्वातीचा लग्न ठरलं सांगायला फ़ोन आला तशी तिला म्हंटल मी" हे बघ स्वाते, तुला सगळे वेगवेगळे सल्ले देतील, पुस्तकं देतील, इमेल पण करतील. पण लक्षात ठेव ऐकावे जनाचे करावे मनाचे. शेवटी आपल मनच खर. अग माणूस कळायला पुस्तक, इमेल नाही तर माणूस वाचायची गरज आहे. तेव्हा वाचणारच असशील तर माणूस वाच बाकी काही नको"

(टीप: इथे इमेल पाठवणार्‍या, पुस्तकं लिहीणार्‍या सगळ्यांच्या सद-हेतु बद्दल मुळीच शंका नाही. फ़क्त कधी कधी माणूस ह्या सगळ्या टेक्निकच्या भानगडीत अडकून पडतो आणी मुळ टेक्निक कशासाठी हेच विसरतो. तर असो हा देखील एक सल्ला "ऐकावे जनाचे... पद्धतीने ऐकावा झाले)