बुधवार, २२ जून, २०११

डोंबिवली स्पेशल : डोंबिवली पुणेरी बाणा



अफव‌ओंपे विश्वास मत रखो! हे मनाला माहीत असतं हो नाही कोण म्हणतय पण बातम्या जेव्हा खासम खाऽस अशा जवळच्या, आतल्या गोटातल्या इसमाकडून येतात तेव्हा विश्वास ठेवावाच लागतो काय करणार.

तर अशीच एक बातमी, मला गेल्याच आठवड्यात समजली. एरव्ही मी तिला "अफवा" असं म्हणून भिरकावून लावली असती. पण ती नेमकी दिली, ती आतल्या गोटातल्या व्यक्तिने. मग काय? मति गहाण ठेवून विश्वास ठेवणं भागच होतं.

खातरजमा करायला ऐकल्याबरोबर तिथे जाणं तर शक्य नव्हतं आमंत्रण मिळालं असतं, अगदी "आगत्याने येणे करावे" टा‌ईपचं आमंत्रण मिळालं असतं तरीही. (आमंत्रण मिळायची शक्यता तशीही कमीच म्हणा. आता हेच बघाना "लेकीला घे‌ऊन जा हो आयुकात" असं नुसतं सांगायचं. पण बा‌ई आयुका लांब पडेल तुला. माझ्याकडे सोय करेन तुझी एखाद दिवस असं कोणी तोंड भरुन म्हणेल तर शप्पथ!)

तर असो मुळ विषय होता ती बातमी... जी आतल्या गोटातून आलेली. बातमी काहीशी अशी होती "पुणं म्हणे बदलतय, पुण्याने म्हणे कात टाकलेय" ह्या टाकलेय शब्दापुढे तिच्या स्वरातून जाणवत होतं आश्चर्य आणि माझ्या मनात ते ऐकताना उमटत होतं प्रश्नचिन्हं.

"म्हणे आजकाल बरीच दुकानं १-४ बंद नसतात." इती माझी बातमीदार.

"नक्की लोंढेकरांची दुकानं असणार ती. जातिवंत पुणेकराची नसणारच." मी बातमीदाराचं म्हणणं एकदम तिच्याच समोर मान्य करायचं नाही म्हणून केवळ हे वाक्य फेकलं.

पण मनातून मी तिच्या बातमीवर कधीचाच विश्वास ठेवलेला कारण पुन्हा तेच ती माझी आतल्या गोटातली खासम खास बातमीदार होती ना. विश्वास न ठेवून सांगते कोणालां. त्यात पुन्हा एका नातेवा‌ईकाचं दुकान त्याचा मुलगा सांभाळायला लागल्यापासून दिवसभर चालु असतं असं एका लग्नाच्या निमित्ताने भेट झाली तेव्हा कळलेलं सत्यवचन होतच जमा, डोकं नावाच्या कपाटात त्यामुळेही ठेवला पटकन विश्वास.

बातमी संपली, बोलणही संपलं, तसा तिने फोनही कट केला. आवांतर बोलून कॉलचं मीटर वाढवायला तो फोन मी थोडीच केलेला!

पुण्याने कात टाकली ठिक आहे. पण मग तिथल्या "पुणेरी बाण्याचं" काय? तो कुणीतरी जपायला नको?

आSहेS आSSहे, हे पुणेपण जपणार ह्या जगात पुण्याबाहेरही कोणी आहे. मी युरेका च्या चालीवर ते आहे आहे म्हणुन गिरकी घेत स्वत:शीच म्हंटलं. त्यांचीच माहिती द्यायला हा लेखप्रपंच आहे ना.

तर लोकहो हे पुणेपण आपल्या परीने जपायचं काम एक मिशन म्हणून गेली बरीच वर्ष काही डोंबिवलीकर्स करत आहेत. पुढे कधीतरी पुणं कात टाकेल ह्याची चाहूल त्या द्रष्ट्या डोंबिवलीकरांना फार पुर्वीच लागली असणार, म्हणून तर ते तो ठेवा पुण्यापासून म्हंटलं तर लांब, म्हंटलं तर ३-४ तासाच्या अंतरावर असलेल्या डोंबिवलीत एक मिशन असल्याप्रमाणे जपत आहेत.

आत्ता त्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्या‌इतपत असेलही कदाचित पण लवकरच ती वाढीला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मला अत्यंत अभिमान वाटतो हे सांगताना की हे "पुणेपण" जपण्याचं काम करणार्‍यांमधे महिलावर्ग आघाडीवर आहे. मी जेव्हा जेव्हा त्यांच्या समोर जाते तेव्हा अगदी दरवेळी त्याच विस्मयचकीत/ भारीत नजरेने त्यांच पुणेपण टिपून घेते.

आज त्यांच्या उदात्त मिशनचा परीचय तुम्हाला व्हावा आणि पुढे मागे डोंबिवलीने पुर्णपणे "पुणेरी बाणा" अंगिकारला तर त्याचं क्रेडीट हे ह्याच दोघींना जावं ह्या निर्मळ उद्देशाने मी हा लेख लिहीत आहे. म्या पामराच्या अल्पमतिने अजून काही जणांची नोंद राहून गेली असेल तर माझा डेटाबेस जरुर अपडेट करावा डोंबिवलीकर्स.

तर ह्या महान कार्यातल्या अग्रणी काकू म्हणजे आमच्या "मुनमुन मिसळ" फेम वाल्या मुनमुन काकू. त्यांच्याच परिचयाने ह्या परिचय कार्याची सुरुवात न झाल्यास त्या स्वत: ये‌ऊन मला खडे बोल लावतील. (सच्च्या डोंबिवलीकराच्या कानात आत्तापर्यंत ते बोल फारसं इमॅजिन न करता देखील त्यातल्या हेल सकट वाजले असतीलच)

"मुनमुनची मिसळ" ह्या अख्यायिके विषयी ऐकतच मी मोठी झालेय. लहानपणापासून मला ह्या नावा विषयी फार कुतुहल होतं आणि हे असं नाव मिसळीच्या दुकानाला देणार्‍या अफलातून व्यक्तीमत्वाला बघायची प्रचंड उत्सुकता होती.

खरतर तेव्हा "मुनमुन" हे नाव "मुनमुन सेन" मुळे डोक्यात फिट्ट होतं आणि "मुनमुन सेन" च्या प्रतिमेमुळेच केवळ मला मिसळवाल्या दुकानाला ते नाव का बॉ दिलय अशी उगाचच उत्सुकता होती.

जेव्हा प्रत्यक्ष तिथे जायची संधी साधली तेव्हा "मुनमुन" हे नाव, ते दुकान चालवणार्‍या काकू आणि तिथे मिळणारी मिसळ ह्या तिन्ही गोष्टींचा मेळ मी काही केल्या घालू शकले नव्हते.

पहिल्यांदा गेले ते मैत्रिणींबरोबर. आम्ही तिघी जणींनी तिथे जायचं ठरवलं. त्याप्रमाणे गेलो देखील तिथे.

गेलो देखील असं लिहायचं कारण, त्यावेळी पॉकेटमनी मिळण्याची चंगळ कॉलेजमधे जायला लागलो तरीही नव्हती. ट्रेनचा पास असायचा, घरुन डबा मिळायचा, रिक्शा वगैरेला लागलेव पैसे तर रोज जाताना मागून घ्यायचे. फारतर दळण आणलं, भाजी आणली तर वरचा एखाद सुट्टा रुपया उदारमनाने आ‌ई ठेवू द्यायची. पार्टी बिर्टी काय ते घरी करायची. हवेच तर मागून घ्यायचे कारण सांगून. अशी पद्धत असताना, नेमके आम्ही "मुनमुनची मिसळ" खायचेय असच सांगून पैसे मागितले. कधी नव्हे ते खरं कारण पटून ते दिले गेले. आणि आम्ही तिघी तिथे जा‌ऊन पोहोचलो.

ह्या तात्काळ परमिशन मिळण्यातच "मुनमुन मिसळ = डोंबिवली चा अभिमान" ह्याची पार्श्वभुमी असण्याची शक्यता नाकारता येत नाही नाहीतर "बाहेरचं खा‌ऊन काय पोटं बिघडवायचेत? की घरातलं अन्न गोड लागेनासं झालय आजकाल?" असं ऐकावं लागायचं इतरवेळी.

तिथे गेलो खर्‍या पण हीऽऽ मोऽठी प्रतिक्षा यादी बघून मागच्या मागे जायची इच्छा झाली. पण समोर का‌उंटर वर बसलेल्या काकुंनी तितक्यात मोठ्या जरब बसवणार्‍या आवाजात विचारलं "किती S? तिघी लेडीज काS?" आणि आम्ही घाबरुन कसबसं, जणू काही तीन लेडीजनी ये‌ऊन काही गुन्हा केलाय ह्या थाटात तोंडातल्या तोंडात पुटपुटत "हो" म्हंटलं.

दुसर्‍या क्षणी त्यांनी एका टेबलावर बसलेल्या जोडप्या पैकी पुरुषाला चक्क ऑर्डर वजा शब्दात सांगितलं "तुम्ही आतल्या बाजूला बसा, मिसेसला बाहेरच्या बाजूला बसुद्या."

गिर्‍हा‌ईकाशी अशा शब्दात कोणी बाहेरच्या हॉटेलमधे बोलतं तर ते गिर्‍हा‌ईक तिथली पायरी पुन्हा कधी न चढतं.

पण काकुंचा शाब्दिक वचक काय सांगावा महाराज. ते जोडपं त्यांनी सांगितल्या प्रमाणेच बसलं. इतकच नव्हे तर नंतर आत जाणार्‍या एका गृहस्थाला काकुंनी चक्क "तुम्ही थांबा, ह्या तिघी आधी आल्यात" असं सांगून चक्क पुन्हा प्रतिक्षा यादीत पाठवलं आणि आमचा नंबर त्या जोडप्याच्या समोरच्या बाकड्यावर लावला.

"एक जण त्या बा‌ईशेजारी बसा, दोघी समोर बसा" अशी सुचना दे‌ऊन जागावाटपाचं काम संपलं.

आम्ही हुश्श हो‌ऊन घाम पुसत ऑर्डर काय द्यायची (म्हणजे तिखट, मिडीयम की साधी मिसळ सांगायची)ह्याचा खल करत होतो. तेव्हढ्यात काकुंचा मुलगा समोर ऑर्डर घ्यायला आला. आमचा नवखेपणा पाहून आणि डिस्कशन ऐकून त्यानेच "मिडीयम घ्या" असा फ़ु.स. (फुकट सल्ला) दिला.

"हा कोण आला टिकोजीराव आम्हाला सांगणारा" असं वाटून माझ्या मैत्रिणिने एक तिखटची ऑर्डर दिली, आम्ही दोघींनी "सेफ प्ले" च्या न्यायाने दोघीमधे एक मिडियम मिसळीची ऑर्डर दिली.

मिसळ आली. येवह्ढही तिखट खायची आमच्या "भाजी आमटीत सुद्धा गुळ" लागणार्‍या पिंडाला सवय नसल्याने, नाक डोळे फुसफुसायला लागले. जा‌ईल तेव्हढ संपवून आम्ही हात धुवायला बाहेर निघतच होतो तेव्हढ्यात काकुंनी आम्हाला ऐकवलच "पुढच्या वेळी साधीच मिसळ घ्या" म्हणून.

काकुंचा मुलगाही सवा‌ई. काकुंच्याच तालमीत तय्यार झालेला.

"मिडियम सांगू की तिखट ए XXXच्या नीट नेता येत नाहीत का प्लेट तुला XXX रस्सा ओत त्या तिखट मधे अजून लक्ष कुठाय XXX" असं एकाच वेळी गिर्‍हा‌ईक, कामाला असणारा पोर्‍या ह्यांच्याशी संवाद साधत बोलतो तेव्हा नवख्या माणसाला थोडं बिचकायला होतच मनातल्या मनात भलतीकडे स्वल्पविराम दिल्याने.

पण तो चेहर्‍यावरची रेषही हलू न देता हे म्हणत असतो. नंतर ऐकून ऐकून आपल्यालाही सवय होते कुठे स्वल्पविराम द्यायचा ह्याची.

(जाणकारांनी फुल्यांमधले संवाद समजून जावेत. अजाण लोकांनी त्यांच्या माहितीतल्या जाणकाराची डिक्शनरी मागवावी, मी जाणून असले तरी ज्या‌अर्थी मी फुल्या वापरल्यात त्या अर्थी मी जाहीर लिहिणार नाही सबब मला विचारु नये ही नम्र विनंती त्या काकु स्टा‌ईल मधे वाचावी. ही विनंती वाचताना जे मला ओळखतात त्यांनी माझा चेहरा डोळ्यासमोर न आणता त्या काकुंचाच चेहरा किंवा तत्वद तुम्हाला जे कोण डॉणीन स्टा‌ईल वाटत असेल तिचा चेहरा डोळ्यासमोर आणावा)

नंतर बर्‍याच वेळा तिथे जायचा योग आला. नंतर कधी तरी तिथे पाटी लागलेली पाहीली "पार्सल मिळणार नाही" अगदी डबा घे‌ऊन गेलात तरी पार्सल मिळणार नाही असं उत्तर मी ऐकलय तिथे.

इतर लोकांन्ना म्हणजे खरतर डोंबिवलीबाहेरच्या लोकांना त्या "मामिच्या मिसळीचे" कोण कौतुक. आता तर म्हणे आमंत्रण मधे स्टा‌ईलीश रित्या ती पेश होते वगैरे वगैरे कोण ते कौतुक. पण आमच्या काकुंच्या प्रेमळ विचारपुशी शिवायची मिसळ म्हणजे बातमे कुछ दम नही लोकहो. खाण्या बरोबर ह्या शाब्दिक फटकेबाजीची जोड हवीच हवी तरच खरी मजा.

अर्थात हे बाहेरच्यांना नाही पटणार म्हणा. त्यांना हा काकंचा मुजोर पणा/उद्धट पणा वाटतो, त्यामुळे केवळ "कोल्ह्याला द्राक्षे आंबट" न्यायाने त्यांना तिथली मिसळदेखील आवडत नाही. पण तरिही सच्चा डोंबिवलीकर अजूनही त्यांच्या फु.स. सकट त्यांच्यावर प्रेम करतो, त्यांच्या दुकाना बाहेरची प्रतिक्षा यादी अजूनही हेच सांगते आमचं "ह्या बाण्यावरही" प्रेम आहे. अस्सल पुणेकर कसा तिथल्या दुकानदारांचे किस्से "कॉय शांगू बा‌ई आमच्या इथली दुकानं ना बंदच असतात १-४" असं लाडीक तक्रार करत सांगतो तसच आम्ही डोंबिवलीकर आमच्या ह्या "मुनमुन मिसळ" वाल्या काकुंबद्दल बोलतो.

मिसळीच्या खालोखाल मराठमोळा पदार्थ म्हणून नंबर लागतो बटाटवड्याचा. तर लोकहो आमच्या इथल्या एक काकू गेली कित्येक वर्ष त्यांचा "पुणेरी बाणा" जपत बटाटेवडे, साबुदाणा वडे विकण्याचा व्यवसाय करतायत. त्यांच्या दुकाना बाहेर "पार्सल मिळणार नाही" अशी पाटी जरी नसली तरी तिथेही एक अनोखी पाटी लक्ष वेधून घेतेच. आणि आपलं लक्ष गेलं नाही चुकुन माकुन तर ते लक्षात आणुन द्यायचं काम त्या काकू अगदी आवडीने करतात.

"नाही नाही नाही, इथे पाव मिळणार नाही"

"पैसे सुट्टे द्यावे"

"आधी पैसे द्या"

अशी वाक्य असलेल्या पाट्या त्यांचा "बाणा" दाखवल्या शिवाय रहातच नाहीत.

प्लीज नोट इथे कृपया, प्लीज अशा शब्दांना जागाच नाहीये कुठेही.

तसही त्या काकुंकडे बघितल्यावर कोणीही त्या सुचनांचं उल्लंघन करण्याच स्वप्नात पण योजणार नाही हा भाग वेगळा.

मला साधं मोठं मं.सु. घालून प्रवास करायची भिती वाटते, इथे ह्या काकू ठसठशीत सोन्याचे दागिने (एखादा दागिना नव्हे, तर शब्दश: दागिने) घालून बटाटे वडे तळत उभ्या असतात. त्यांचेही दुकान संध्याकाळी ६ शिवाय चालूच होत नाही बर्‍याचदा.

आजकालच्या मुलामुलीबद्दल फारच स्वच्छ आणि स्पष्ट मतं त्या त्यांच्याच तोंडावर ऐकवतात. आणि तरिही त्यांच्या दुकानातले बटाटे वडे घेण्यासाठी डोंबिवलीकर प्रेमाने गर्दी करतात.

डोंबिवली करांना देखील डोंबिवलीच्या बर्‍याच अशा गोष्टींचा "जाज्वल्य का कायसासा अभिमान" वाटायला लागलाय. म्हणून तर म्हंटलं पुणं बदलतय, पुणं कात टाकतय असं ऐकलं आणि लक्षात आलं पुणेरी बाणा म्हणून डोक्यात असलेला "जाज्वल्य अभिमान" "गिर्‍हा‌ईक ह्या व्यक्तीला उपर्‍या लोकांनी उगाचच जोडलेली अदब द्यायची पद्धत ह्याविषयी जातिवंत पुणेरी दुकानदारांची असलेली नाराजी" हे सगळे हळू हळू पुण्यातून स्मगल हो‌ऊन डेक्कन क्वीन नाहीतर इंद्रायणी मार्फत डोंबिवलीत ये‌ऊन रुजतय, वाढतय आणि त्याचा आम्हाला चक्क जाज्वल्य का कायसासा अभिमानही वाटतोय.

ती आतल्या गोटातली बातमी अगदीच अफवा नसेल तर पुणेकरंनो सावधान !लवकरच पेटंट घ्या तुमच्या बाण्याचं नाहीतर अजून काही हजारो वर्षांनी "जाज्वल्य अभिमान" "आमच्या वेळी असं नव्हतं" वगैरे कॉपिरा‌ईट टा‌ईपची वाक्य डोंबिवली स्पेशल म्हणून ओळखली जातील ह्यात शंकाच नाही.

जाता जाता: नुकतेच डोंबिवलीच्या भोपर नामक विभागात एका फार जुन्या काळपासून असलेल्या मंदीरात जायचा योग आला. तेव्हा मंदीराच्या बाहेर लावलेल्या फलकाने "हा डोंबिवली बाणा" कुठपर्यंत पोहोचलाय ह्याची झलकच मिळाली. तुम्ही स्वत:च बघा खालच्या प्रचि मधे काय लिहिलय त्या फलकावर ते.



मंगळवार, २६ एप्रिल, २०११

मी, माझी मैत्रिण आणि सिंडरेला बूट



जनरली मला दहा काय पण चार दुकानही फिरायचा कंटाळा येतो खरेदीला गेल्यावर, त्यातून चप्पल खरेदी म्हणजे तर काय बघायलाच नको. चप्पलेचं आणि माझं एकमत कधीच होत नाही. जी चप्पल मला आवडते ती माझ्या पायाच्या मापाची नसते. एखादी चप्पल आवडलीच आणि मापाचीही निघाली तर ती रोजच्या ट्रेन प्रवासात टिकाव धरेल इतपत भक्कम नसते. जी भक्कम असते ती दिसायला तितकिशी आकर्षक नसते. एक ना दोन नाना तर्‍हा....आणि येव्हढाऽऽ चोखंदळ पणा करुन चप्पल घेऊन बाहेर पडावं, तरिही दरवेळी दुसऱ्या कुणाच्या चपला बघितल्या की वाटतं "आयला ह्यांना कशी बहुदुधी आखूड शिंगी गाय" मिळते?

तर त्या दिवशीही नेहमी प्रमाणेच अगदी तस्सच झालं. आधीच मला "तिच्या" प्रत्येक गोष्टीचं अपाऽऽर कौतूक आहे. तिच्या दिसण्याचं.. तिच्या रहाण्याचं.. तिच्या लिखाणाचं आणि तिच्या छंद जोपासण्याचं सुद्धा.

त्याचं काय आहे ना...तिचं एक मस्त छानसं, छोटसं घर आहे...तिच्या चौकोनी कुटूंबाभोवती फिरणार त्यांचं एक वर्तुळ आणि त्या वर्तुळाच्या जोडीने तिची तिची अशी जपलेली छोटी मोठी वर्तुळं... मला सगळयाचच अपाऽऽर कौतुक आहे, अगदी पहिल्या भेटीपासूनच. (प्लीज नोट वर्तुळं म्हणजे विबासं नव्हे )


तर त्या दिवशी आम्ही भेटलो तेव्हा तिच्या पायात एकदम "आखुड शिंगी बहुदुधी गाय" टाईपच्या म्हणजे दिखाऊ+टिकाऊ टाईपच्या चप्पला होत्या. त्या तिने "अमक्या ढमक्या दुकानात सेल मधे घेतल्या म्हणे दोनच दिवसा पुर्वी" मी देखील नेमके दोनच दिवसा पुर्वी बरीऽऽऽच दुकानं फिरुन शेवटी एका चप्पलेवर शिक्कामोर्तब करुन माझ्याकरता नविन जोडे घेऊन आलेले. माझ्या नविन जोड्यांचं नवखेपण जागोजागी लावाव्या लागलेल्या बॅंडेड मधुन जाणवत होत. माझ्या पायाची आणि त्यांची अजून म्हणावी तशी युती काही होत नव्हती.

पण ती मात्र सिंडरेलाच्या गोष्टीतली सिंडरेला असावी तसे तिचे जोडे तिला फिट्ट बसलेले. ना कुठे सोलवटण्याचे व्रण होते ना कुठे बॅंडेड चे ठिगळ.

मग का नाही मनातल्या मनात तिचा हेवा वाटणार, सांगा बर? उगाचच आपलं मनात आलं तिचे "हे" बुट तरी एखाद दिवस मला मिळाले घालायला तर...!


हे असं वाटणं म्हणजे ते शाळेत निबंधाला विषय असतो तसं झालं पण आता तसं वाटलं खरं त्याला काय करणार!


पण कधी कधी(च) तुमची प्रार्थना इंन्स्टंट फळाला येते आणि तुमचं नशिब तुम्हाला "छप्पर फाडके" देतं (निदान तसं भासवतं तरी), तर तो दिवस देखील त्या "कधी कधी" पैकीच एक असावा , कारण त्या दिवशी गप्पांच्या नादात माझ्या घरुन निघताना ती नेमकी चुकून माझे बुट घालून घरी गेली आणि तिच्या त्या "सिंडरेला बुटांना" माझ्याच घरी विसरुन गेली.


सिंडरेलाला तिचा तो एक हरवलेला बुट आणि त्या जोडीने भाग्य परत मिळाल्यावर जेव्हढा आनंद झाला असेल त्याच्या कैकपटीने अधिक आनंद मला त्या दिवशी तिचे बुट मिळाल्यावर झाला.

हळूच पाय त्या बुटात घालून बघितला. मस्त वाटलं एकदम. मग चालून बघण्याचा मोह झाला. चार पावलं चालताना एकदम भाऽऽरी फिलिंग आलं. मग दिवसभर तिच्याच बुटात पायाला अडकवून पायाला भिंगरी लावून निघाले फिरस्तीला, औटघटकेचं म्हणतात तसलं राज्य अनुभवायला. एकिकडे कॉन्शस का काय म्हणतात तो म्हणत होता "तिचे बूट परत करुन ये, दुसऱ्याच्या वस्तू वापरु नयेत" इत्यादी इत्यादी. पण मनातल्या हेव्याने त्यावेळी तरी त्या कॉन्शसला गप्प बसवलं.

टेलिफोनचं बील भरायला रांगेत उभी राहीले तेव्हा उगाचच वाटत होतं रांगेतल्या एकूण एक बायका माझ्या बुटांकडेच बघतायत म्हणून. समोरची प्रत्येक व्यक्ती माझ्या त्या सिंडरेला वाल्या बुटांचा हेवा करतेय असं वाटून गेलं.. उगाचच. आणि त्याचीही गंमत वाटली.


बीलं झाली भरुन... बाजारहाटही करुन झाला. आठवून आठवून कामं काढून जास्तीत जास्त वेळ त्या बुटाचा सहवास मिळवायचा प्रत्येक ठराव मनाने पास केला.


थोडावेळ बरा गेला, पण कधी कोण जाणे हळूच त्रासाने डोकं वर काढलं, पायांना जरा जरा त्रास जाणवायला लागला. कधी त्या बुटांच्या हिल्स मुळे पाय पटकन मुडपला जाऊन दुखायला सुरुवात झाली तर कधी त्या बंद बुटांमुळे पायाला चांगलाच घाम फुटायची वेळ आली. पायाचा अंगठाही जरासा का होईना सोलवटला, मग वाटेत थांबून दुखावलेल्या अंगठ्याला बँडेड लावून झाली. समोरुन बघणार्‍याला बंद बुटाआड लावलेली बँडेड दिसत नव्हती खरी आणि त्यामुळेच बुटांकडे वळणार्‍या नजरांमधला भाव अजुनही तोच होता फक्त त्याची आता मला गंमत वाटत नव्हती . त्या दुखण्याने एकंदरीतच माझ्या चालण्याचा स्पीड चांगलाच मंदावला होता आणि मंदावणाऱ्या स्पिड बरोबर ते सिंडरेलाचे बुट घालण्याचा उत्साह पण मावळला होता.


दुखर्‍या पायावर आणि हिरमुसल्या मनावर फुंकर मारत मी मग ऑटोने घरी येणच पसंत केलं. घरी येऊन टेकते नाही तोच बेलच्या हाकेला ओऽऽ देत मला दार गाठावं लागलं.


दारात माझी तिच ती "सिंडरेला बूऽट" वाली सखी, जिचं मला अपार कौतुक आहे..उभी होती... तिच्या स्वत:च्या दुखर्‍या पायावर फुंकर मारत आणि एका हातात माझे बूट सांभाळत.


हेच खरे!


लहानपणी वीज गेली
की मेणबत्तीच्या प्रकाशात
सावल्यांचा खेळ रंगायचा
हरिण, ससा, पक्षी, मासा
वेगवेगळा आकार त्या
सावल्यांमधून तयार व्हायचा

घामाच्या धारा आणि गुणगुणणारे डास
कासवछापचा चुरचुरणारा उग्रसा वास
सगळ्या सगळ्याचा विसर पडायचा,
सावल्यांच्या त्या भासमय खेळात
जीव असा रंगून जायचा

शेवटी छोटे काय नि मोठे काय?
नको असलेला वर्तमान विसरायला
आभासी दुनियाच लागते
तात्पुरती का होईना

हेच खरे!



शनिवार, १२ फेब्रुवारी, २०११

चक्र /वर्तुळ भाग ४

"आईSS, आता लहान आहे का मी? लग्न होऊन मला एक मुलगी पण झालेय ..! मी बघेन ग काय नी कसं मॅनेज करायचं सगळं ते. तू कशाला पण आईंना असं बोललीस..."

"अगंSS.. पSण..."

"पSSण काय पण, तू नको मधे पडूस ह्यात, मला करुदे ना हॅन्डल माझ्या पद्धतीने. तू पडतेसच कशाला ह्या घरातल्या गोष्टींमधे?"

"अगं.. पण सहज बोलले मी. कुणी काही बोललं का तुला त्यावरुन?"

"रामायण झाल्यावर मगच तुला पटणार का माझं म्हणणं? आणि मी फोन ठेवतेय आता, अख्या बिल्डींगला कळेल ह्या आवाजात अजून बोलले तर ..कोण कोणास काय म्हणाले ते"

फोन कट केला नी अभिची एंट्री झाली. शेवटची तारसप्तकातली वाक्य कानावर पडली त्यावरुन त्याला कल्पना आलीच काय झालं असेल त्याची.

"फोन मधुन धूर येतोय मनु" त्याने तरिही विनोदाचा क्षीण प्रयत्न केला आणि चुकीच्या वेळी चुकीचा विनोद केल्याची शिक्षा म्हणून एक जळजळीत कटाक्ष त्याच्याकडे फेकला गेला.

"तू ना तुझ्या आईवरच गेल्येस बहुतेक. काय कुठे बोलावं ते कळतच नाही तुला" मुद्दाम खवट बोलणं होतं की अजून एक विनोदाचा फुटकळ प्रयत्न ह्यात न पडता तिने..."होSS ना! तुम्हाला कळतं नाSS???" म्हणत वार परतवला त्याचा.

ह्यातलं तुम्हाला हे "आदरार्थी एकवचन" नसून "अनेकवचन" होतं हे लक्षात येऊन विषय बदलला नाही तर आज तिसरं महायुद्ध नक्की घडणार ह्याची जाणिव होऊन तो शहाण्या नवर्‍याची भुमिका पार पाडण्यासाठी गप्प बसून तिला कामात मदत करत राहिला.

तिने पुन्हा फोन लावायला घेतला तेव्हा गोंधळून त्याने "आता पुन्हा काय..?" असा चेहरा केला त्यावर "तुम नही समझोगे, लडकीया होती ही ऐसी है" असा डायलॉग, त्याला तिने न बोलताच ऐकू आला

-------

"म्हणे ह्या घरातल्या गोष्टींमधे कशाला पडतेस?" " हे घर... म्हणजे?" "काल परवा पर्यंत माझी लेक होती ना ही शेखर?" "आता एकदम परक्यासारखी तोडून बोलली? का? काय केलं मी इतकं? तिची काळजी वाटून सहज बोलले ना मी?"

"हो पण निमाबाई ती आहे की समर्थ. ठेवा की तिच्यावर विश्वास. आता लेक सासरी गेलेय आपली. तिला तिचा संसार तिच्या चुक बरोबर सकट करुद्यात की. काळजी ठिक आहे पण… इतकंही गुंतणं योग्य नाही"

"तुला काय जातय बोलायला? म्हणे गुंतणं योग्य नाही. जीवाला घोर लागतो तो जाणायला आईच व्हायला हवं"

"आता गेली का गाडी पुन्हा त्याच ट्रॅक वर...! चला विषय बदला..."

"असं म्हंटलं की झालं तुझं, तरी पण चूक नाहीये म्हणणं तुझं. कळतय पण नाही वळत असं काहीसं होतय"

"फोन वाजला निमाबाई, घ्या लेकीचाच असणार.. बोला जरा ते डोळे पुसून.."

"हम्म! बोल... नाही ग रागावले नाही मी..बSरं.... होS अगं SS...... चल बाळा काळजी घे. फोन ठेवते आता"

------------

"बरं राणिसरकार, तुमचा क्राईंग एपिसोड संपला असेल तर आपण जेवून घेवुयात का आता? आई बाबा पण आलेत आत्ताच"

"मला नव्हतं रे दुखवायचं तिला असं, मी आधी तेच व्यवस्थित सांगायचा प्रयत्न करत होते तिला. पण.. तिच्यापर्यंत ते पोहोचतच नव्हतं आणि मग गेलं माझ्या तोंडून निघून तसं... पण वाक्य बोचरं असलं तरी फॅक्ट आहे ना ती..?

सल्ला देणं एखादवेळेस ठिक आहे पण उठसुट अशी काळजी वाटून ‘मी खाते किती, झोपते किती, काम किती करते’ असं प्रत्येक बाबतीत विचारत राहिली ... बर विचारणं पण ठिक म्हणते मी, पण मला विचार ना काय विचारायचं ते.

"कित्ती काम पडतं ना मनुला" टाईप वाक्य डायरेक्ट आईंना ऐकवायचं म्हणजे...! वादाला कारण नाही होणार? मSग, तेच सांगत होते तिला. मी आहे ना समर्थ माझ्या स्वत:साठी बोलायला! एकतर कानाला यंत्र लावत नाही, इथुन घसा फ़ोडून सांगावं लागतं त्यातही भेटल्यावर बोलू म्हंटलं तरी तिलाच रहावत नाही मग विषय जातो वाढत आणि फट्ट दिशी तुटतो.. रबर ताणलेला"

"तू बघशील अभी, मी खूप चांगली आई होईन. म्हणजे माझी आई खूप चांगली, प्रेमळ आहेच रे पण मी ना पिल्लूला एकदम वेगळं वाढवेन, पुर्ण मोकळेपणा देईन, तिची मैत्रिण होईन. तिच्या बाबतीत बिलकूल पझेसिव्ह रहाणार नाही...."

"मातोश्री आता सध्या जेवायची कृपा कराल का? तुमचं पिल्लू सध्या तुमच्या करता थांबलय जेवायचं"

"तू हो पुढे मी आलेच.."

----------

पिल्लू - वय वर्ष २/३ - "आई...आऽई आऽऽई आऽऽऽई आणि फक्त आई"

पिल्लू - वय वर्ष ४ "आई... आमच्या बाईऽऽ किनई..... बाईं म्हणतात... बाई अशा नी बाई तशा" आणि तरिही ऍट द एण्ड ऑफ़ द डे "आऽई तू कोणाची आहेस? फक्त माझी आहेस ना?" "माऽऽझी आई..मी तुला कध्धी कध्धीच सोडून जाणार नाही"

- वय वर्ष ५ "आई, मी तनु कडे जाऊ आज पुर्ण दिवस रहायला? तनू माझी बेस्ट फ्रेंड आहे तुला माहितेय!...... प्लीऽऽज"

- वय वर्ष ७ "आई, मला ना तुझ्यापेक्षा निशूताई जास्त आवडते समोरची..."

- वय वर्ष …. - ब्लाऽऽऽऽब्लाऽऽऽऽ ब्लाऽऽऽह ……

- वय वर्ष …. - "........................"?????

----------------

खोटं का बोलू आधीची सगळी वाक्य मनाला कुठे तरी सुखावून जायची. मी पझेसिव्ह नाही असं म्हंटलं तरिही मला सुखवायची. आणि तिच्याकडून मी कसलीच अपेक्षा ठेवणार नाहीये हे स्वत:ला आणि इतरांना ठासून सांगितलं वेळोवेळी तरी देखील .."आई, मला ना तुझ्यापेक्षा निशूताई जास्त आवडते समोरची..." हे वाक्य कुठेतरी सुक्ष्मसी कळ देऊन गेलं....एका क्षणापुरतं का होईना, गेलं काहीतरी दुखावून.

का? माहित नाही. कदाचित माझा पदर सोडून पिल्लू आता वेगळं वर्तुळ तयार करतय ह्याची जाणिव एकाच वेळी सुखावणारी आणि आता असा आणि इतका फक्त आमचा आमचा असा सहवास रहाणार नाही ह्या जाणीवेने दुखावणारी ... त्यातूनच आलं असेल ते खट्टूपण.

गोष्ट खरं तर तीळा येव्हढी छोटीशी... अजून पुढे जाऊन ह्या गोष्टीचं काही वाटणार नाहीच, तसच कशाला ते खट्टुपण देखील फ्रॅक्शन ऑफ़ सेकंद म्हणतो तसं तरळलेलं. ह्यालाच पझेसिव्ह नेस म्हणतात का? पण मी अजिबात पझेसिव्ह होणार नाहीये हे मी किती तरी वेळा घोकलय की मनाशीच माझ्या.

अजून "दिल्ली बहोत दूर है …" बरच काही घडणारे ह्यापुढेही, टिन एज जसं येईल तसं बर्‍याच उलथापालथी होतीलच म्हणा. आणि मग वय वर्ष अमुक तमुक - च्या पुढे ते ब्लाऽऽह ब्लाऽऽह ब्लाऽऽह वाले रिकामे रकानेही भरले जातील.

"चिंगी महिन्याची झाली नाही तोच" चा अंक प्रक्षेपीत करत मी...." मग मी पण एकदिवस काळजी वाटून तिला असाच फोन करेन का? आणि मग काय म्हणेल ती "माझ्या घरामधे तू लक्ष नको देऊस ग ममा?" असच म्हणेल का? काय असेल माझी तेव्हा रिअ‍ॅक्शन?"… हा सगळा विचार करत नाहीये आणि तसही हे वर्तुळ असलं तरिही असच ह्याच क्रमाने होणार नाही काही सगळं. पण प्रत्येक वेळी त्या त्या फेज मधून जाताना कुठेतरी मनामधे ह्या वर्तुळाकार नात्यातल्या जुन्या गोष्टी एक क्षण डोळ्यापुढून जातील.

शेवटी काहीही म्हणा, पटकन मान्य करा किंवा करु नका, नाती आपापली फ्रेम घेऊन येतात. काळाप्रमाणे आणि ज्याच्या त्याच्या स्वभावा प्रमाणे ह्या फ्रेमचं रंगरुप थोडं थोडं बदलतं इतकच.

माझी आई आणि आजी, मी आणि आई आणि आता पिल्लू आणि मी चक्र तर चालूच रहाणार. काही गोष्टी बदलतील, काही बदलल्यात असं वरुन तरी भासेल पण शेवटी चक्र ते चक्रच, काही गोष्टी ह्या कालातीत असतात. नात्यांमधल्या व्यक्तींच्या जागा बदलतात पण नातं तसच असतं वर्तुळासारखं हेच खरं.



मंगळवार, ८ फेब्रुवारी, २०११

मी जुन्या फांदीप्रमाणे लागले वाळायला

मी जुन्या फांदीप्रमाणे लागले वाळायला
अन मला जाळून आता लागले जाळायला

टाळण्यासाठी बहाणे शोधिले त्यांनी किती?
मीच सोयीने बहाणे लागले पाळायला

जाण आता गाळलेले अर्थ सारे तो म्हणे
मीच माझे शब्दही मग लागले गाळायला

तू कशाचा रे पुजारी जाणले मी हे जरी
का तुझ्या खोट्या रुपावर लागले भाळायला?

छापलेले सर्व जे मी ठेविले माळ्यावरी
का पुन्हा मी तेच सारे लागले चाळायला?



बुधवार, २ फेब्रुवारी, २०११

ती सांज हरवूनी गेली


ती सांज हरवूनी गेली
जी कधी भावली होती

स्पर्शाची अनवट गोडी
अन नि:शब्दाची बोली
मज जिने शिकवली होती
ती सांज हरवूनी गेली..

काळाच्या लाटेमधे
ती सांज वाहूनी गेली
जाताना आठवणींची
ती नक्षी ठेवूनी गेली

ती गेली हरवून आणि
मी वाट हरवुनी बसले
मौनाची कोणती बोली?
मी शब्दही विसरुनी गेले

रात्रीची वाटता भिती
मग मिटून मी ही गेले
पिंजरा घालुनी भवती
मी त्यातच मग फ़डफ़डले

कढ दाटूनी येतो जेव्हा
मज सोबत करते नक्षी
मग उडूनी जातसे तेव्हा
मन पिंजर्‍यातला पक्षी



बुधवार, १२ जानेवारी, २०११

प्रेमग्रंथके पन्नोपर...

प्रकरण - १

त्याने तिच्या डोळ्यात बघीतलं... तिने त्याच्या डोळ्यात बघीतलं, बघता बघता दिलाची धकधक वाढली, डोक्यात प्रेमाची घंटी वाजली आणि त्याच्या डोळ्यात ती जग विसरुन विरघळून गेली. हे असं प्रेम प्रत्यक्षात सोडा कागदावर देखील जमणं, मला ह्या जन्मी तरी इऽ म्पॉऽ सिऽ बऽ ल.

नाही म्हणायला लग्न ठरल्यावर इतर नॉर्मल लोकांसारखेच आम्हीही अगदी रोज नेम असल्या सारखे एकमेकांना भेटलोय, बर्‍याचदा घरातल्या मोठ्यांना शेंड्या लावून गुपचुप हा भेटीचा कार्यक्रम केलाय, फ़ोनच्या रिंगचे पण कोडवड्‌र्स ठरवून झाल्येत त्यावेळी. ह्या आणि अश्यासारख्या आणखी बऱ्याच काही बाही किरकोळ, आणि काही कागदावर न मांडता येण्यासारख्या गुलाबी गोष्टी केल्यात नाही असं नाही तरीS पSSण.. खास फ़िल्मी.. कादंबरीमय गुलाबी प्रेऽऽम?????? श्याऽऽ कधी जमलच नाही.

त्याने कधी गुडघ्यात वाकून.. हातात गुलाब धरुन "आय लव्ह यु" म्हंटलं नाही आणि मी कधी अंगठ्याने जमिनीवरची माती उकरत.. पदर नाहीतर ओढणीशी चाळा करत मान वेळावत.. "आम्ही नॉऽय जॉ" असं उगाचच लाज पांघरत ओठाचा चंबू करत लाडीकपणे म्हंटलं नाही.

हे असं काही स्वत: उठून करणं एकवेळ बाजूला ठेवूयात पण असं काही, कागदावर त्या हिरो हिरविणीकडून करुन घ्यायला देखील पेन हातात धरणार्‍या हातातलं रक्तं गुलाबी असावं लागतं बहुतेक, कारण ते ही कधी जमलं नाही

पण ह्यावेळी मी अगदी नेटाने प्रयत्न करुन गुलाबी लिहायचं ठरवलं. वातावरण निर्मिती चांगली व्हावी म्हणून.. आणि आमच्या मनगटातील रक्त तापट ताम्रवर्णी असल्यामुळे, मी गुलाबी कागद आणून बघुयात असा विचार करुन गुलाबी कागद घेवून आले. घासाघीस करुन वीस रुपयांना सहा गुलाब आणून ते डायनिंग कम रायटिंग टेबलवर काचेच्या ग्लासात ठेवले. मी स्वत: गुलाबी रंगाचा ड्रेस घालून बसले. बरोबर प्रेमकथांचा बायबल कम गीता कम कुराण जे म्हणाल ते घे‌ऊन बसले आणि त्या "प्रेमग्रंथ के पन्नोपर" दिल्या बरहुकूम केली सुरुवात "अ" आणि "ब" च्या गुलाबी पहिल्या भेटीबद्दल लिहायला.

पहिल्यांदा "अ" ला सायकल वरुन येताना दाखवला, "ब" शी त्याची टक्कर हो‌ऊन "ब" ची पुस्तकं खाली पडतात आणि बॅगरा‌ऊंडला गाणं वाजतं असं लिहीलं. काय करणार? पुर्वीच्या सिनेमांचा इंपॅक्ट! नुसता सिनेमांचा नाही हा, माझ्या शाळेतल्या मला सिनि‌अर्स असणार्‍या आणि त्यावेळी तरी प्रेमजोड्या बनलेल्या लैला मजनूंचा पण इंपॅक्ट म्हणाना आता त्यातल्या बर्‍याच जोड्यांचं "दो हंसो का जोडा बिछ्ड गयो रे" झालय आणि तरिही "दे लिव्ह्ड हॅपिली एव्हर आफ्टर.." असाच एण्ड झालाय ती गोष्ट वेगळी.

पण भर रस्त्यात असं कोणी कोणाचा धक्का लागून पडेऽल, मग आपण गाऽणं म्हणू, सूऽर दे‌ऊ म्हणत ही मंडळी त्याच रस्त्यावर कुठेतरी लपून बसल्येत कामधाम सोडून असं दृष्यं कितीही स्वप्नं स्वप्नं म्हणून ओरडले तरी डोळ्यापुढे काही ये‌ईना.

मग तो प्रसंग बदलायचं ठरवून कॉलेज मधेच पहिली भेट झाली असं लिहायचं ठरवून पेन चालवायला घेतलं. पण हाऽय रे दैवा! तिथेही आमचं ताम्रवर्णी रक्त आड आलं आणि काही केल्या "प्रथमं तुजं पाहताऽ... जीव वेडाऽऽवला.." काही मनात वाजलं नाही आणि कागदावरही उमटलं नाही.

मग सध्या टि‌आरपी रेस मधे आघाडीवर (?) असलेल्या (निदान आमच्या घरात तरी रेस मधे आघाडीवर असलेल्या आणि अधून मधून ना‌ईलाजास्तव बघाव्या लागणार्‍या) सिरि‌अल्सना साक्षी ठेवून विचार करावा म्हंटलं तर तिथेही आमच्या मनाच्या घोड्याने पेंड खाल्लं मी कन्फ़्युज्ड झाले, "अमर प्रेम" मधे दाखवल्याप्रमाणे आधी भांडण दाखवून मग मैत्री.. प्रेम असे टप्पे दाखवू? त्यात पण आजचे ज्वलंत (?) विषय घुसडवून कहानी मे (ओन्ली) ट्विस्ट लावू की "माझिया प्रियाला प्रीतं कळेना" सारखं त्यांच्यात आधी मैत्री, प्रेम दाखवून घरच्या घरीच हर्डल रेस असल्यासारखे मधे मधे बिब्बे घालू? श्या विचार करुन करुन नमनालाच घडाभर तेल खर्ची झालं. तरी बरं त्या कॅन्सर वाल्या सिरि‌अलला पुर्ण विराम मिळालाय आणि भाग्यलक्ष्मी सध्या आ‌ऊट ऑफ़ फ़ोकस (आमच्या घरातून आउट ऑफ फोकस ) आहे नाहीतर मी पार भंजाळूनच गेले असते. :फ़िदी:

पण तरिही गाडी काही पुढे सरकत नव्हती. म्हंटलं जा‌ऊदेत भेट बीट, टक्कर बिक्कर, ह्या न झेपणार्‍या कामांनी चक्कर यायच्या आत आपण पुढचं वर्णन बघुयात जमतय का ते. फ़ार तर काय भेट कशी झाली ते दाखवायला फ़्लॅशबॅकचा वापर करावा लागेल हाय काय नाय काय!

तर आता भेटीचं वर्णन बाजूला ठेवुयात. भेटला असेल हा "अ" त्या "ब" ला "क्ष" ठिकाणी असं समजुयात (डोन्ट वरी फ़्लॅशबॅक है ना! ) (आता म्हणाल "अ" "ब" "क्ष" ही कसली अनरोमॅंटीक नाव. तर लोकहो आता नावांच्या घोळामधे अजून अर्धा तास दवडण्या इतकी शा‌ई काही माझ्या पेनात नाही तेव्हा थोडावेळ घ्या की चालवून तशा काय कमी गोष्टी चालवून घेता काय एरव्ही ) मुळ मुद्दा काय तर ते भेटले नी प्रेमात पडले. प्रेमाच्या बायबल कम गीता कम कुराण अशा त्या प्रेमग्रंथचा पुढचा अध्याय वाचायला मी सुरुवात केली त्याशिवाय माझ्या पेनात ताकद कशी येणार हो?. "प्रेमजीवांचे वर्णन" ह्या धड्यावर ये‌ऊन थांबले.

कसाS दाखवावा बरं..अं... "अ"? गोरापान? मेघंS सावळाSS माSझा राSजा? की ऍंग्री यंग मॅन? की मिक्श्चर ऑफ़ ऑल? आणि कशी दाखवावी "ब"? गोरी गोरी पान फ़ुलासारखी छान जणू फ़े‌अर ऍंड लव्हली ची मॉडेल? की बिप्स सारखी स्मार्ट (?) सावळी (?) कशी का असेना पण ती हटके हवी हे वाक्य अगदी अधोरेखीत करुन ठेवलय पुस्तकात. आणखी एक मुद्दा अधोरेखीत केलाय त्यात ,तो म्हणजे "प्रेमात पडलेले जीव एकमेकांसाठी राजकुमार आणि अप्सराच" दुसरी काहीही उपमा नाही. "दिल आया गधी पे तो परी क्या चीज है" हे आपण म्हणतो, त्या फ़िल्ड करता आ‌ऊटसायडर्स लोकं पण तिच्या चष्म्याने तो "राजकुमार" आणि त्याच्या डोळ्यात ती "अप्सराच" . तेव्हा आपल्याला गधी वाटो नाहीतर आणखी कोणी लिहिताना मात्र त्यांचा गुलाबीवाला चष्मा लावूनच लिहायचं म्हणजे मग दोघे अगदी तस्सेच दिसणार "राजकुमार आणि अप्सराच" अगदी. आठवा की सैफ़ आणि अमृता सिंगची त्यांच्या गूड ओल्ड डेज मधली जोडी. एरव्ही तुम्ही त्यांना काय वाट्टेल ते म्हणू शकाल पण त्यांचा चष्मा लावलात तर म्हणाल ना ते दोघेही अगदी "राजकुमार नी अप्सरा" म्हणून! गेलाबाजार जुन्या जमान्यातली संध्या आठवा. नाहीतर कालपरवाची माधुरी (हो हो तिच ती रामाची सिता) आठवा. डोळे वटारु नका ती अप्सराच आहे पण तिला म्हणे कोण तो झिपर्‍या संजय दत्त आवडला होता एकेकाळी (मला नाही हो कधी खरं वाटलं मी अफवा अफवा म्हणून उडवून लावलं पण लोकं म्हणतात असं) तर सांगा आहे का तो ह्या अप्सरे पुढे कोणी? पण लावला होता ना तिने चष्मा म्हणून दिसला असेल तिला तो राजकुमार. चष्मा फुटला आणि पुढचं संकट टळलं म्हणे. आता तो अभिषेक बच्चनांचा ज्युनिअर, वाटलाच ना अ‍ॅशला राजकुमार (कोण ते मला फटके देऊ का म्हणतय? त्यांनी चष्मा काढून हेच वाक्य म्हणावं ) तर असो थोडक्यात काय त्यांच्या नजरेला ते राजकुमार आणि अप्सराच असतात.
थंबवाला रुल नंबर एक तर कळला मला त्याखाली अजून एक महत्वाचा असाच थंबवाला (अंगुठेछाप) रुल नंबर दोन दिसला. तो असा "तो आणि ती वर्णाने गोरे असोत की सावळे, गुणाने मात्र दोघेही दुधापेक्षाही गोरे हवेत. दोघेही सर्वगुणसंपन्न, म्हणजे ती अधोमुखी, नम्र, प्रेमळ, सुंदर, सोज्वळ स्मार्ट हवी म्हणजे हवीच. त्यात ग्रे शेडींग अजिब्बात चालणार नाही म्हणजे नाही. आणि "तो" देखील हुषार, नम्र, देखणा अगदी आदर्ष पुरुष असाच हवा. हवा म्हणजे काय हवाच. त्यालाही "नो ग्रेड शेडींग" रुल आहेच.

आणि हो जेवणात जसं लोणचं हवं चवी पुरतं तसं दोघांचा हा मनाचा दुधाळ गोरेपणा हायला‌ईट व्हायला एखादा त्याचा मित्रं किंवा तिची मैत्रिण किंवा असं एखादं कॅरेक्टर हवं जे मनानं एकदम काळं कुट्टं आहे. काळं कुट्टं इतकं की अमावस्येचं आकाश देखील त्याच्या पुढे उजळ ठरेल. त्यात कॉंप्रमा‌ईज चालणार नाही. मग ती व्यक्ती "ती" असेल तर तिच्या पेहरावात काहितरी भडक आणि ठसठशीत हवच म्हणजे भांगापासून नाकापर्यंतं येणारं कुंकू वगैरे किंवा तत्सम काहीतर. थोडक्यात काय तर लहान मुल घाबरुन रडेल असा मेकअप हवा तिचा. आणि व्यक्ती जर "तो" असेल तर शकुनी मामा छाप काहितरी हवच. आणि हो त्यांचं एकच काम त्यांनी सारखे बिब्बे घालायचे स्टोरीत आणि द एण्ड लवकर होण्यापासून वाचवायचं .

मग तो अंगुठेछाप म्हणजे थंबवाला रुल नंबर एक वाचून पुढे लिहायला बसले. "लैला को देखो मजनू की नजरसे" तसच "ब" को देखो "अ" की नजरसे म्हणत केलं तिला एकदम "सर्वगुणसंपन्नं अप्सरा" आणि तिच्या नजरेने बघत बघत त्यालाही केला "सर्व गुणसंपन्न राजकुमार"

आणि अंगुठेछाप म्हणजे थंबवाला रुल नंबर दोन वाचून आणला मधे एक बिब्बा त्यांच्या. दिलं त्या बिब्ब्याला नाव "क" आणि केलं त्या "क" ला खलनायिका.

येव्हढं लिहीपर्यंत दिवेलागणीची वेळ झाली. मग ती गुलाबी गुंडाळी तशीच ठेवून कुकर लावायला उठले.

आणि त्या ग्रंथातपण हेच लिहीलेलं होतं रुल नंबर तीन म्हणून, हेच म्हणजे लेखिकेने वरण भाताचा कुकर लावावा हे नव्हे तर कहाणी अशी एकदम सांगून संपवायची नाही हे लिहिलेलं. कहाणी कशी असावी तर म्हणे "ती डेली सोपसारखी वर्षानुवर्ष तरी चालायलाच हवी किमान पक्षी क्रमश:ची एण्ड नोट कमीत कमी १०-१२ वेळा तरी लागायलाच हवी"

म्हंटलं सोप्पं आहे आपण आपला "टिंब टिंब" लोकांचा नियम लावायचा. ते कसे जेवायला २ माणसं असोत नाही तर २०, डाळ तेव्हढीच १/२ भांड लावतात आणि वर म्हणतात "तुम्हाला काय कळणार, पाण्यालाही चव आणते ती खरी सुगरण!" तस्सच करायचं २ भाग कसले २ पॅरेग्राफ़ मधे संपणारं मटेरि‌अल चु‌ईंगम सारखं ताणून ताणून २० भागापर्यंत न्यायचं. त्या च्यु‌इंगम मधला सगळा रस संपून ते दाताला, ओठाला चिकटून दात दुखायला लागेपर्यंत ताणायचं आणि ताणण्याचं समर्थन म्हणून टि‌आरपीचं तुणतुणं वाजवायचं की झालं.


प्रकरण - २

तर उदरभरण झाल्यावर लिहायला सुरुवात केली, हो मला रिकाम्या पोटी गुलाबी बिलाबी विचार देखील जमत नाहीत.

"अ" ची भेट होते "ब" शी "क्ष" जागी. दोघेही प्रेमात पडतात आणि मधे येतो बिब्बा "क" नावाचा. मग पुन्हा एकदा सिरि‌अल्सचा नवनीत गा‌ईड सारखा वापर करत "क" चे थोडे काळे कुट्ट प्रताप दाखवले आणि रंगवले ताटातूट, हर्डल रेस चे प्रसंग. मग समज गैरसमज की परत सगळं निवळून सुरु होते "एका लग्नाची गोष्ट". चला संपली एकदाची गोष्ट लग्नाच्या अक्षता दे‌ऊन. त्या पुढचा भाग हा प्रेमग्रंथामधे येत नाही, तो संसारचक्र नावाच्या क्रमिक पुस्तकाचा भाग आहे त्यामुळे गुलाबी स्टोरीचा दि एण्ड, अक्षता घे‌ऊनच दाखवायचा हा थंबवाला रुल नंबर चार आहे त्या प्रेमग्रंथातला.

प्रकरण २ फ़ारच छोटं झालय का? को‌ई बात नही, घालते नंतर पाणी त्यात. आहे की फ़ंडा माझ्यापाशी तो माझ्या ओळखीच्या टिंब टिंब लोकांचा .पण प्रकरण २ चा इतकाच भाग लिहिपर्यंत रात्रीचे १२ वाजत आलेले म्हणून कष्टाने ते गुलाबी भेंडोळे दिले गादीखाली ठेवून नी डोळे मिटून निद्रादेवीच्या आधीन झाले.

जर्रा नाही झोप लागत तर खोलीत कोणाचे तरी चढेल स्वर कानावर आले. उठून बघते तर काय तीन जणं - दोन मुली आणि एक मुलगा मला घेराव घालून रागाने बडबड बडबड करत होते. मला वाटलं चोर शिरले की काय माझ्या घरात? आजकाल चोर पण एकदम बन ठनके येतात की काय? एकदम कोण्या देशीचा राजकुमार नी स्वर्गिय अप्सरा बनून? अशी एक शंका मनाला चाटून गेली. तेव्हढ्यात ती त्या तिघांमधली अप्सरा वचावचा शिव्या द्यायला लागली अगदी ट्रेन मधल्या भांडणात बायका देतात तसल्या शिव्या तिच्या शिव्यांमधे पेरलेल्या शब्दांवरुन माझ्या थोडं थोडं लक्षात आलं की ही बया सॉरी अप्सरा तर माझ्या त्या गुलाबीवाल्या कथेतली हिरवीण आहे. अरेच्चा! पण ही अधोवदना, सलज्ज, सालस मुलगी का अशी अचानक बिब्बेवाली सारखे रंग दाखवायला लागली? माझ्या मनात प्रश्न उमटतोय नाही तोच तो राजकुमार पण तिची री ओढत माझ्याशी भांडायला लागला. "तुझ्यावर केस करीन" म्हणाला. "केस करीन?" कम्माल आहे बॉ ह्यांची. तर ती तिसरी मुलगी ढसाढसा रडायला लागली. हे मात्र अती होतं अगदी. तिचा रोल काऽऽय ती रडतेय काऽऽय? जिने रडायचं ती भांडतेय आणि जिने काळेकुट्टं प्रताप करायचे ती रडतेय? काय चाल्लय काय? हे असलं काही वळण नव्हतं लिहीलं त्या "प्रेमग्रंथ के पन्नोपर" !

म्हंटलं "तुमची मागणी तरी काय?" " इतकी छान त्या ग्रंथाबरहुकूम कथा लिहीली मी मग का बर माझ्यावर इतका राग?" त्यांचा जरा कमर्शि‌अल ब्रेक साठी स्टॅच्यु होताच मी कसं बसं माझं वाक्य पुर्ण करुन घेतलं.

"मला गुडीगुडी वागून कंटाळा आलाय" अ आणि ब दोघांनी एकदमच तक्रार केली

"आणि मला नुसतं वा‌ईट्ट वा‌ईट्ट वागून कंटाळा आलाय" बिब्ब्याने संधी मिळताच बोलून घेतलं.

"आमच्या ब्लॅक एण्ड व्हा‌ईट शेड्सची सरमिसळ करा नाहीतर कोर्टात खेचू" असं त्या तिघांनी एकमतानं एकवलं.

"दुसर्‍या दिवशी बघते" असं मंत्र्यांच्या स्टा‌ईल मधे आश्वासन देत मी ती वेळ निभावून नेली. दुसर्‍या दिवशी कामाच्या धामधुमीत विसरुनच गेले मी असं काही आश्वासन दिलय ते (हे ही पोलिटिकली करेक्टच म्हणा)

लक्षात आलं तेव्हा धावत बेडरुम मधे जा‌ऊन ते भेंडोळं शोधायला सुरुवात केली. ते भेंडोळं गायब होतं तिथून. म्हंटलं सुंठी वाचून खोकला गेला. पण कसचं काय लेकीची हाक ऐकून बाथरुम मधे डोकावले तर दिसलं, त्या गुलाबी कागदाची गुलाबी होडी करुन लेक अंघोळीच्या टबात होडी होडी खेळत बसलेली.

एकदम धस्सं झालं, म्हंटलं त्या कागदावरच्या तिघांचं काय झालं असेल आत्तापर्यंत? मग लेकीचा आरडा ओरडा काना‌आड करत मी ती होडी पाण्यातून बाहेर काढली आणि भीत भीत त्या तिघांकडे बघितलं. पाण्यामधे भिजल्याने तिघांचे रंग ओळखू न येण्या इतके एकत्र झालेले. खा परत शिव्या लेखिका बा‌ई म्हणत तिघांकडे पुन्हा एकदा बघायचं धैर्य दाखवलं, तर काय? ती तिघेही चक्क शीळ घालत हसत होती आणि लेकीला धन्यवाद देत होती, त्यांना हवे होते तसे रंगांचे शेडींग झाले होत म्हणून.

माझी मात्र "केस होणार माझ्यावर" ही एकमेव चिंता अशी झटकन मिटली.

प्रकरण ३ चांगलाच धडा शिकवून गेले आणि भविष्यात ते रुल्स बरहुकूम लिहून केस होण्याची आफ़त मी ओढवून घ्यायची नाही हे ठरवून पण टाकलं. त्याप्रमाणे माझा मीच ठरवलेला थंबवाला रुल नंबर फ़र्स्ट एण्ड लास्ट म्हणून तो प्रेमकथांचा बायबल कम गीता कम कुराण असलेला "प्रेमग्रंथं" दिला माळ्यावर टाकून.

एक सुचना: माळ्यावर ठेवलेला तो ग्रंथं कुणाला हवा असेल तर एका आठवड्यात संपर्क साधा पुढच्या आठवड्यात मला सगळी रद्दी विकायची आहे

विषेश सुचना क्रमांक १: क्रमश: टाकायचे सगळे भाग/प्रकरणं एकत्रच टाकलेली आहेत तुम्हाला हवं तर रोज एक प्रकरण वाचा किंवा एकदमच वाचून संपवा.

विषेश सुचना क्रमांक २: भाग कंटाळवाणे वाटल्यास तो दोष ग्रंथाच्या रुल नंबर तीनचा मानावा

last but not least अशी टिप: सगळी प्रकरणं एका दमात न कंटाळता वाचून जो संपवेल, इथे हसून पहिली प्रतिक्रिया नोंदवेल आणि तरिही त्या ग्रंथाची मागणी संपर्कातून करेल त्याला कुरि‌अरचा खर्च माफ़